सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढल्याने पशुधनावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. सध्या जनावरांमध्ये आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यासह विदर्भाच्या अनेक भागात एप्रिल महिन्याचे तापमान ४४ अंशांवर गेले आहे. या तापत्या उन्हाचा परिणाम जसा मनुष्यावर पडत आहे, तसाच परिणाम जनावरावरही जाणवत आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
ज्यात जनावरांना मुबलक प्रमाणात पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच उन्हापासून नागरिक जसे उपाययोजना करीत आहेत. तशाच पद्धतीने जनावरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
उन्हाळ्यातील जनावरांची घ्यायची महत्त्वाची काळजी
- पाण्याचे व्यवस्थापन : जनावरांना २४ तास स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध असावे. कडक उन्हात पाण्याची तहान वाढते, त्यामुळे निर्जलीकरण (Dehydration) टाळण्यासाठी पुरेसे पाणी पाजावे.
- गोठ्यातील सुविधा : गोठा हवेशीर असावा. छतावर पेंढा टाकून किंवा पाण्याचे फवारे मारून गोठा थंड ठेवावा. जनावरांना दिवसा थेट उन्हात न बांधता सावलीत किंवा झाडाखाली ठेवावे.
- आहार : जनावरांना सकस आणि पचायला हलका चारा द्यावा. हिरवा चारा आणि पशुखाद्य सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा द्यावे.
- उष्णतेपासून संरक्षण : दिवसाच्या वेळी (सकाळी १० ते संध्याकाळी ५) जनावरांना चरायला पाठवू नये. म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो, त्यामुळे त्यांना पाण्यात (तलावात किंवा अंगावर पाणी मारून) डुबकी मारण्याची शक्य असल्यास व्यवस्था करावी.
- आरोग्य : उष्माघाताची लक्षणे (उदा. जड श्वास, खूप लाळ सुटणे) दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उन्हात जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्यांची उंची जास्त असावी. गोठ्यात हवा खेळती ठेवावी. सकाळी व सायंकाळी जनावरे चारण्यासाठी न्यावे, तसेच वेळेवर पाणी पाजावे. वेळप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. - डॉ. अनिल वाहूरवाघ, प्रभारी तालुका पशुधन अधिकारी, मूर्तिजापूर जि. अमरावती.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
