ठाणे : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी वरदान ठरेल आणि देशात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक क्रांती घडवेल, असा विश्वास परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केला.
ई-ट्रॅक्टरची निर्मिती करणारे ठाण्यातील उद्योजक असल्याने ठाण्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या ई-ट्रॅक्टरची नोंदणी रविवारी एका विशेष कार्यक्रमात झाली. यावेळी सरनाईक बोलत होते.
ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ई-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या अॅटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे आणि विक्री भागीदार अभिषेक शिंदे हे उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले की, २०३० पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये २० ते ३० टक्के वाहने ही विजेवर चालणारी असावीत, असे सरकारचे धोरण आहे.
त्या अनुषंगाने ई-वाहनांना टोलमाफी, तसेच खरेदीवर थेट अनुदान देण्याची सरकारची योजना आहे. डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई-ट्रॅक्टरचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च अत्यल्प आहे.
विजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत ६० ते ७० टक्के कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात ई-ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
दीड लाखांपर्यंत अनुदान
◼️ ई-ट्रॅक्टर खरेदीवर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत दीड लाखांपर्यंत अनुदान देणार आहे.
◼️ एक एकर नांगरणीसाठी ई-ट्रॅक्टरला केवळ ३०० रुपये खर्च येतो.
◼️ या उलट डिझेल ट्रॅक्टरला हाच खर्च १,२०० ते १,५०० रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशांची बचत होणार आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटीतील ऐतिहासिक क्षण
भारतातील पहिला स्वदेशीनिर्मित इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात आणला असून, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ट्रॅक्टरचे अनावरण केले होते. त्याचीच नोंदणी आज आपल्या हस्ते होत असल्याचे सरनाईक या वेळी म्हणाले. देशाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण असल्याचेही ते म्हणाले.
अधिक वाचा: 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजेनेचे काम कसे चालते? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर