रणजी क्रिकेट : तामिळनाडू विरुद्ध मुंबई

तळाच्या फलंदाजांनी केलेल्या संथ फलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेत तामिळनाडूविरुद्ध दुस-या दिवसअखेर चांगले पुनरागमन केले.

पहिल्या डावात ३७४ धावा उभारलेल्या मुंबईकरांनी दिवसअखेर तामिळनाडूची ५ बाद २३९ धावा अशी अवस्था करुन पकड मिळवली.

प्रथम फलंदाजी करणा-या मुंबईने दुस-या दिवशी ७ बाद ३१४ धावांवरुन सुरुवात केली. पहिल्या दिवशी २० धावांवर नाबाद राहिलेल्या अष्टपैलू अभिषेक नायरवर मुंबईची मदार होती. परंतु, नायर एकही धावाची भर न टाकता बाद झाला. आपला दुसराच रणजी सामना खेळत असलेल्या आकाश पारकरने मात्र ४५ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ३३ धावांची खेळी करत मुंबईला समाधानकारक मजल मारुन दिली.

यानंतर फलंदाजीला उतरलेल्या तामिळनाडूची सुरुवात अडखळती झाली. आकाशने चौथ्याच षटकात अभिनव मुकुंदचा (९) त्रिफळा उडवून तामिळनाडूच्या फलंदाजीला सुरुंग लावला. यानंतर हुकमी मुरली विजय (११), कौशिक गांधी (६) आणि विजय शंकर (१८) फारशी चमक न दाखवता बाद झाल्याने तामिळाडूचा डाव ४ बाद ६९ असा घसरला. यावेळी, मुंबईक फास आवळणार असेच चित्र होते.

एका बाजूने टिकून राहिलेल्या बाबा इंद्रजितने १७३ चेंडूत १२ चौकारांसह नाबाद १०५ धावांची खेळी करुन संघाची पडझड रोखली. त्याने अर्धशतक झळकावलेल्या वॉशिंग्टन सुंदरसह पाचव्या विकेटसाठी १५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सुंदरने ९१ चेंडूत ११ चौकार व एका षटकारासह ६९ धावा फटकावल्या. धवल कुलकर्णीने त्याला बाद करुन ही जोडी फोडली. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंद्रजित आणि स्टार अष्टपैलू रविचंद्रन आश्विन (८*) खेळपट्टीवर नाबाद होते.