शीतल मोगल (आहारतज्ज्ञ) -
अनेक वेगवेगळ्या डाएटची सोशल मीडियात हल्ली फार चर्चा असते.(Shravan Fasting) आजकाल OMAD(one meal a day) अर्थात ओमॅड डाएटची चर्चा आहे. म्हणजे दिवसातून एकदाच जेवण. खरंतर नुकताच श्रावण सुरू झाला आहे आणि श्रावणात उपवास, त्यातही नक्त- भुक्त, असे उपवास केले जातात.(weight loss)
खरे पाहता, आपली शरीररचना ही निसर्गाशी खूप एकरूप असते. निसर्गात जेव्हा जेव्हा बदल होतात तेव्हा तेव्हा आपल्या शरीरातही बदल होत असतात. आता श्रावणाचेच पाहा, या महिन्यात ऊन कमी असते.(OMAD vs traditional Indian fasting) सतत रिमझिम पाऊस. त्यामुळे शरीराच्या हालचालीही मंदावतात. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे चयापचय क्रियाही खूप मंदावलेली असते. दिवसात खूप खाण्यात आले तर स्वास्थ्याचा समतोल बिघडतो. प्रतिकारशक्ती खूप कमी होते. त्यामुळे श्रावणात कमी खावे, एकवेळच खावे, हलका आहार, अशी योजना होती.
आता ओमॅडची चर्चा आहे, तेही एकभुक्त राहणेच आहे. असे उपवास शरीरासाठी फायद्याचे. ‘जो मिताहारी तो सर्व गुणकारी’ असे म्हणतात. अर्थात, ज्यांना सतत खूप थकवा येतो त्यांनी हा उपवास करू नये. गर्भवती महिलांनी हे उपवास करू नयेत. मधुमेह असलेल्या व्यक्ती, लो बीपी असलेले यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपले आहार नियोजन करावे. मनाने उपवास करू नयेत.
उपवास कसा करावा?
१. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस व मध घालून घ्यावे. नंतर थोड्या थोड्या अंतराने तीन ते चार ग्लास कोमट पाणी प्यावे.
२. दुपारच्या वेळी म्हणजे जेवणाच्या वेळी संत्री ज्यूस, डाळिंब ज्यूस, नारळ पाणी, ताक, असे घ्यावे किंवा फलाहार करावा.
३. उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाणा, भगर, शेंगदाणा, शिंगाडा, गूळ, तळलेले पदार्थ, बटाटा घेऊ नयेत.
४. सूर्यास्ताच्या आधी हा उपवास सोडावा. उपवास सोडताना साधे वरण- भात व कोशिंबीर प्रथम घ्यावी. नंतर त्याच्या जोडीला श्रावण महिन्यात येणाऱ्या भाज्या, जसे की हादग्याची फुले, जाईचा मोहर, श्रावण घेवडा, दोडका, पडवळ, लाल भोपळा, अंबाडी, कर्टुले, पाथ्र्याची भाजी, भारंगी या वर्षातून एकदा येणाऱ्या भाज्या खाव्यात. भाज्या उपवासादरम्यान पचनास अतिशय हलक्या असतात.
५. या उपवासामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो. इन्फ्लेशन मार्कर सुधारतो. वजन कमी होते. ब्लोटिंग, ॲसिडिटी कमी होते. सतत ताप येणे, सर्दी- खोकला होण्याचे प्रमाण कमी होते.