वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण आहारात छोटे - मोठे बदल करतात. वेटलॉस करण्यासाठी एक महत्वाचा बदल केला जातो तो म्हणजे आहारातून साखर पूर्णपणे वगळली जाते, जेणेकरून कॅलरीजचे प्रमाण कमी होईल आणि वजन घटवण्यास मदत मिळेल. अशा परिस्थितीत, विशेषतः साखर टाळून त्याच्या ऐवजी गूळ खाणं हा हेल्दी पर्याय मानला जातो. वेट लॉस डाएट पाळणारे लोक साखर खाणे टाळतात; परंतु गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी साखरेला आरोग्यदायी पर्याय शोधतात, ज्यामध्ये 'गुळाचा' प्रामुख्याने समावेश होतो. साखरेला 'हेल्दी' पर्याय म्हणून आजकाल अनेकजण चहा, कॉफी किंवा गोड पदार्थांमध्ये गुळाचा वापर करताना दिसतात. अनेकांचा असा ठाम विश्वास असतो की, साखर सोडली आणि गूळ सुरू केला की वजन आपोआप कमी होऊ लागेल. पण हे खरंच इतकं सोपं आहे का?(jaggery vs sugar for weight loss).
गूळ नैसर्गिक असल्यामुळे तो शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण खरंच साखरेऐवजी गूळ खाल्ल्याने वजन कमी (jaggery for weight loss myth or fact) होतं का असा प्रश्न कित्येकदा आपल्याला पडतो. गुळामध्ये असलेले पोषक घटक, त्यातील कॅलरीज आणि शरीरावर होणारा परिणाम समजून घेतला तर या प्रश्नाचं खरं उत्तर मिळू शकतं. वजन कमी करताना साखर आणि गूळ यापैकी नेमका कोणता पर्याय योग्य ठरतो आणि गूळ किती प्रमाणात खावा ते पाहूयात... न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स 'सुश्री एडविना राज' यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, वजन कमी करण्यासाठी(is jaggery better than sugar for weight loss)साखरे ऐवजी गूळ खाणं कितपत योग्य आहे ते पाहूयात...
साखरे ऐवजी गूळ खाणं वेटलॉससाठी फायदेशीर आहे का?
न्यूट्रिशनिस्ट एडविना राज यांच्या मते, साखरेऐवजी गुळाचा वापर करणे हा आरोग्यासाठी एक चांगला आणि 'हेल्दी' पर्याय मानला जातो, परंतु यामुळे वजन कमी होत नाही. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत गुळावर कमी प्रक्रिया (Processing) केलेली असते, त्यामुळे त्यात लोह (Iron), कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण साखरेपेक्षा जास्त असते.
परंतु, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर आणि गूळ या दोघांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जवळपास सारखेच असते. त्यामुळे, या दोन्हीपैकी कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढू शकते. वजन कमी करण्यासाठी साखर सोडून फक्त गुळाची निवड केल्याने वजनावर फारसा मोठा परिणाम होत नाही; कारण वजन कमी करण्यासाठी केवळ पदार्थाची निवड महत्त्वाची नसून, तुम्ही दिवसभरात एकूण किती कॅलरीज (Total Calorie Intake) घेता, यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे.
गूळ आणि साखर यामध्ये नक्की फरक काय?
न्यूट्रिशनिस्ट एडविना राज यांच्या मते, गूळ हा उसाच्या रसापासून किंवा ताडाच्या रसापासून तयार केला जातो आणि त्यात काही नैसर्गिक पोषक तत्वे टिकून असतात. याउलट, पांढरी साखर ही अत्यंत रिफाइंड असते, ज्यामध्ये प्रक्रिये दरम्यान पोषक तत्वे नष्ट होतात आणि फक्त 'कॅलरीज' उरतात. गुळाची चव साखरेपेक्षा थोडी वेगळी असते आणि ती गोड खाण्याची क्रेविंग्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठीच, अनेकजण साखरेऐवजी गुळाला पसंती देतात. इतकेच नाही तर, साखरेच्या तुलनेत लोक सहसा गूळ कमी प्रमाणांत खातात, ज्यामुळे नकळत कॅलरी इनटेक थोडा कमी होऊ शकतो.
जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्याने नेमकं काय होत ?
न्यूट्रिशनिस्ट एडविना राज यांच्या मते, अनेकजण 'गूळ आरोग्यदायी आहे' असा विचार करून तो जास्त प्रमाणांत खातात. परंतु, गूळ हा देखील गोडाचाच एक प्रकार आहे. जास्त प्रमाणांत गूळ खाल्ल्यास आरोग्याच्या इतर समस्या त्रास देऊ शकतात. गुळाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' जास्त असतो, त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी जास्त प्रमाणात न खाता तो मर्यादित प्रमाणातच खावा. गुळात साखरेइतक्याच कॅलरीज असतात. त्यामुळे तो 'हेल्दी' आहे म्हणून जास्त खाल्ल्यास वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. गूळ हा उष्ण असतो, उन्हाळ्यात किंवा जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढून नाकातून रक्त येणे किंवा पुरळ येण्यासारखे त्रास होऊ शकतात. अतिप्रमाणत गूळ खाल्ल्याने काहींना बद्धकोष्ठता किंवा पोटाचे विकार होऊ शकतात. साखरेप्रमाणेच गुळाचे कण दातात अडकून राहिल्याने दात किडण्याची शक्यता असते.
वजन कमी करण्यासाठी नेमके काय करावे?
न्यूट्रिशनिस्ट एडविना राज यांनी स्पष्ट केले आहे की, गोड पदार्थ साखरेचे असोत, गुळाचे, मधाचे किंवा एखादा स्वीटनर असो; हे सर्व पदार्थ अत्यंत मर्यादित प्रमाणातच खावेत. तुमच्या आहारात प्रथिने, फायबर, हेल्दी फॅट्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. यामुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार गोड खाण्याची इच्छा कमी होते. दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे शारीरिक हालचाल करा. यामध्ये वेगाने चालणे, योगासने, जिम किंवा एखादा खेळ खेळणे यांचा समावेश असू शकतो. यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. बाजारात मिळणारी शीतपेये, मिठाई आणि पॅकेज्ड स्नैक्स खाणे टाळा. यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते, जी आरोग्यासाठी हानिकारक असते.
