'आजीचं पत्र हरवलं आणि ते मला सापडलं' लहानपणी हे गाणं तुम्हीही नक्कीच गायलं असेल. मात्र आता त्यात जरा बदल करावा लागे ल. आजीचं पत्र हरवलं इथेच वाक्याचा शेवट. कारण पत्र लिहिणे, पत्राची वाट पाहणे, अक्षरातील प्रेम, अश्रुंनी पाणावलेला कागद सारेच आता काळाआड गेले आहे. पत्र व्यवहार आजही होतो, मात्र अगदीच मोजक्या कामांसाठी. (World Letter Writing Day 2025: Have you ever written a letter to someone from your heart? write a heartfelt story..)त्याची जागा आता टेक्स्ट मेसेजने घेतली आहे. नव्या आणि जलद संदेशवहनांचा आता वापर केला जातो. अर्थात आधुनिक जगात तंत्रज्ञान वाऱ्याच्या वेगाने पुढे जात आहे. नव्या शोधांचा वापर केला जाणे अगदी सहाजिक आहे. मात्र पत्रात जी मज्जा असायची ती मेसेजमध्ये नाही हे मात्र नक्की.
शाळेत पत्रलेखनाचा तास असायचा. हिंदी, मराठी, इंग्रजी विविध भाषांमध्ये पत्र लिहिण्याचा सराव आपण सगळ्यांनीच केला आहे. प्रति, प्रेषक, मायना, सा.न.वि.वि हे सारे शब्द ऐकताना आता अगदी नॉस्टेलजिक वाटतात. शाळेत त्यांची घोकमपट्टी करावी लागायची. पत्र हा प्रकार काही नवा नाही, अगदी राजा महाराजांच्या काळातही दूतव्यवस्था होती. टपाल व्यवस्था भारतात ब्रिटिश काळात सुरु झाली. अंदाजे १८५४ सालापासून लोकांना टपाल व्यवहार व्यवस्थित जमायला लागला होता. लांब-लांबचे पत्र व्यवहार अगदी सामान्य माणसेही करु लागली होती. तारयंत्रणा भारतात आल्यावरही जन-सामान्यांसाठी संदेशवहनाचा पर्याय पत्र हाच होता.हळूहळू टपाल तिकिटे, मनीऑर्डर, पार्सल सेवा, रजिस्टर्ड पोस्ट अशा अनेक सुविधा सुरू झाल्या. गावोगावी लाल टपाल दिसायला लागले आणि पोस्टमन काका तर सगळ्यांचे विश्वासू संदेशवाहक दुवाच झाले होते.
हाताने लिहिलेले पत्र मग ते आई-मुलाचं असो किंवा प्रियकर-प्रियसीचे त्यातील भावना वाचकाच्या मानाला भावायच्या. अक्षर पाहून मनाला समाधान मिळायचे. स्व-लिखित पत्रात प्रेम, भावना जास्त जाणवायच्या. मेसेज सेकंदात पोहचतो मात्र पत्र पोहचायला आठवडाभर लागतो. त्यामुळे वाट पाहण्यातली ती मजा आता उरली नाही. जुनी पत्रे आजही कपाटात जपून ठेवणारे अनेक जण आहेत. पत्र जरी संदेश वहनासाठी सुरु झाले तरी हळूहळू तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला. कारण आपल्या माणसांपासून दूर राहणाऱ्यांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचे काम हे पत्रच करत होते. पत्रदिनानिमित्ताने तुम्हीही नक्की एखादे पत्र लिहा. कामासाठी किंवा खरंच काही महत्वाचा संदेश पोहचवण्यासाठी आता विविध सुविधा आहेतच. तरी एक आठवण म्हणून आणि पत्राची मज्जा अनुभवायला काहीच हरकत नाही.