सकाळ होते, अलार्म वाजतो तरी काही जाग येत नाही. हल्ली थंडीच्या दिवसांत तर असा अनुभव रोजच येतो. पांघरुणातून बाहेर यावंच वाटत नाही. अशावेळी मग वारंवार वाजणारा आलार्म पाहून आपण कसंबसं उठतो. उठल्यानंतर अंगात प्रचंड आळस भरलेला असतो. तो बाहेर काढण्यासाठी मग आपण दोन्ही हात वर करून ताणून देतो, मान आणि अंग वाकडं- तिकडं करतो आणि एक मोठी जांभई देतो. अशी जांभई किंवा आळस दिल्यानंतर आपल्यालाच थोडं बरं वाटतं आणि मग उठून आपण कामाला लागतो. असं करण्याची सवय तुम्हालाही असेल तर ती अजिबात सोडू नका. उलट आणखी मनमोकळा मस्त आळस द्या. कारण हे असं करणं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून बघा त्यामुळे नेमके कोणते लाभ होतात..(Benefits of Giving Angdai or Morning Stretching)
शरीर स्ट्रेच करून आळस दिल्याने होणारे फायदे
१. आपण जेव्हा झोपलेलाे असतो, तेव्हा शरीरातले वेगवेगळे स्नायू आखडून गेलेले असतात. रक्ताभिसरण थोडे हळूवार झालेले असते. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठाही थोडा हळुवार असतो. जेव्हा आपण आळस देतो, तेव्हा सगळे स्नायू ताणले जातात. त्यामुळे मग रक्तप्रवाह अधिक सुरळीत होतो आणि शरीराला जास्त ऑक्सिजन मिळते. यामुळे मग अंगात जरा तरतरी येते, एनर्जी आल्यासारखे वाटते.
२. आळस दिल्याने मेंदूलाही चांगल्या प्रमाणात रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे मेंदूही छान ॲक्टीव्ह होतो आणि लगेच रिफ्रेश होऊन कामाला लागतो.
३. असं म्हणतात की आळस दिल्याने मेंदू आणि शरीराला पुरेशा प्रमाणात एनर्जी मिळत असल्याने मन आणि शरीर दोन्हीही तणावमुक्त होते. अंग एकदम मोकळे आणि रिलॅक्स वाटू लागते.
