Join us

प्रेमात पडल्यानंतर लग्न करण्याची योग्य वेळ कोणती असते? एक्सपर्टनं दिलं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:22 IST

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. पण घाईच्या नादात काही कपल भविष्यात याचा काय परिणाम होईल याचा विचार करायला विसरतात.

Relationship Tips : लग्नाचं नातं हे इतकं जबाबदारीचं असतं की, ते ठरवत असताना खूप विचार करणं गरजेचं असतं. अरेंज मॅरेजमध्ये अनेकदा घरच्यांना मुलगी आवडली म्हणून मुलगाही लग्नास तयार होताना अनेक बघायला मिळतं. अरेंज मॅरेजमध्ये 'चट मंगनी पट ब्याह' ही पद्धत चालूनही जात असेल. पण जिथे लव्ह मॅरेज म्हणजे प्रेम विवाहाचा विषय येतो, तिथे 'चट मंगनी पट ब्याह' ही बाब महागातही पडू शकते. सांगायचं ताप्तर्य असं की, काही दिवसांचं किंवा महिन्यांचं रिलेशनशिप आणि त्यानंतर लगेच लग्न करणं हे काही समंजसपणाचं लक्षण नसेल. कारण एकमेकांना चांगल्या पद्धतीनं जाणून न घेता एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणं घाईचं ठरू शकतं. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. पण घाईच्या नादात काही कपल भविष्यात याचा काय परिणाम होईल याचा विचार करायला विसरतात.

अनेकदा तर रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांना हेही माहीत नसतं की, रिलेशनशिपनंतर लग्न करण्याची योग्य वेळ कोणती असते. एका रिलेशनशिपमध्ये अशी कोणती स्टेज असते जेव्हा लग्न करणं योग्य ठरतं. अशाच काही ५ स्टेजबाबत रिलेशनशिप कोच कंन्टेट क्रिएटर सुरभि गांधीनं सांगितलं आहे.  

पहिली स्टेज - प्रेम आणि रोमान्स

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा ही पहिली स्टेज असते. त्या व्यक्तीसोबत बोलणं, त्याच्या हातात हात घालून फिरणं सगळं भारी वाटत असतं. ती व्यक्तीच जणू विश्व आहे असं होऊन बसतं. हाच आपल्या स्वप्नातील राजकुमार किंवा राजकुमारी असं वाटायला लागतं. समोरची व्यक्ती आपली काळजी घेत असल्यानं ती व्यक्ती आपल्याला जास्तच आवडू लागते. कारण असं कुणी तुमच्याशी वागलेलं नसतं. हा एक मोह असतो. त्यामुळे या स्टेजमध्ये लग्न करण्याऐवजी पुढच्या स्टेजला जायला हवं. 

दुसरी स्टेज - चांगल्या वाईट गोष्टी समजतात

जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवता, तेव्हा एकमेकांच्या चांगल्या-वाईट गोष्टी समजत असतात. तेव्हा अशी जाणीव होऊ शकते की, ही व्यक्ती इतकीही परफेक्ट नाही, जेवढा तुम्ही विचार केला होता. या स्टेजमध्ये पार्टनर एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला त्यांच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करत असतात. अशात या स्टेजमध्ये अनेकदा वादही होतात. तेव्हाच अनेकांचं ब्रेकअपही होत असतं. त्यामुळे या स्टेजमध्येही लग्न करणं घातक ठरू शकतं.

तिसरी स्टेज - एकमेकांना समजता

वादाची स्टेज संपल्यानंतर ब्रेकअप पार करून पुढे आलेले काही कपल्स एकमेकांना स्वीकारतात. ते एकमेकांसाठी स्वत:मध्ये काही बदलही करतात. वाईट गोष्टी मागे सोडून नात्यात पुढे जाण्याचा विचार करतात. एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयीबाबत तडजोड करण्यास शिकतात. अशात त्यांच्यात वाद कमी होतात आणि एकमेकांसोबत नातं पुढे नेण्याचा एक विश्वास निर्माण होतो. 

चौथी स्टेज - निर्णय घेण्याची वेळ...

रिलेशनशिपमधील चौथी स्टेज ही कमिटमेंट करण्याची असते. जेव्हा तुम्ही लग्न करू शकता. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले असाल आणि जबाबदाऱ्या घेण्यास तयार असाल तर हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही लग्नाचा विचार करू शकता. तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्ही एकमेकांना ओळखलेलं असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट सवयी, प्रेम, स्वातंत्र्य यात बॅलन्स साधणं गरजेचं असतं. जर काहीच शंका नसेल तर ही वेळ लग्न करण्याची योग्य वेळ असू शकते.

टॅग्स :रिलेशनशिपलग्न