Relationship Trend : नातेसंबंधातील वेगवेगळे ट्रेंड्स जसे की, गॅसलाइट, मायक्रो चीटिंग, मॅरेज ग्रॅज्युएशन, क्वांटम डेटिंग, होबोसेक्शुअॅलिटी इतरही असे अनेक वेगवेगळे ट्रेंड्स अलिकडे सोशल मीडियावर फारच चर्चेचा विषय ठरताहेत. जेन-झीमध्ये हे ट्रेंड्स बरेच लोकप्रिय आहेत. पण या ट्रेंड्सच्या माध्यमातून नात्यांची व्याख्या जरा बदललीये. सध्या अजून एका रिलेशनशिप ट्रेंडची चर्चा सुरूये, तो म्हणजे "Date Them Till You Hate Them" म्हणजेच काय तर जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत नातं टिकवा.
काय आहे "Date Them Till You Hate Them" हा ट्रेंड?
जर या ट्रेंडबाबत सोप्या भाषेत सांगायचं तर यात व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत तोपर्यंतच नात्यात राहतो, जोपर्यंत त्यांच्या छोट्या-छोट्या सवयी त्रासदायक वाटून, त्यांना वैतागून शेवटी ब्रेकअप करणं सोपं होत नाही. यात समस्या समोर ठेवून स्पष्टपणे बोलणं किंवा स्पष्ट चर्चा करणं टाळलं जातं, उलट त्या समस्यांना दुर्लक्षित करून वाढू दिल्या जातात, म्हणजे पाणी नाकाच्या वर जाऊ दिलं जातं आणि त्यानंतर ब्रेकअप करणं सोपं होतं.
इमोशनल सेफ्टी
या ट्रेंड मागचं लॉजिक म्हणजे इमोशनल सेफ्टी. ब्रेकअपचा त्रास खूप जड जातो. त्यामुळे लोक आधीपासूनच नकारात्मक अनुभव साठवून ठेवतात, ज्यामुळे ब्रेकअपच्या वेळी त्यांना आधीच इमोशनली डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे ब्रेकअप करताना फार जास्त वाईट वाटत नाही.
हेल्दी की धोकादायक?
या ट्रेंडबद्दल सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. ज्यात तरूणांनी आपली काही मतं नोंदवली आहेत. अशीच काही मतं पाहुयात.
ट्रेंडचे समर्थक काय म्हणतात?
"Date Them Till You Hate Them" हा ट्रेंड त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे कन्फ्रंटेशन टाळतात किंवा ज्यांना वाटतं की त्यांची गोष्ट कोणी ऐकणार नाही. यामुळे त्यांना कंट्रोलमध्ये असल्यासारखं वाटतं.
विरोधक काय म्हणतात?
हा स्वार्थी, भावनिकदृष्ट्या क्रूर आणि अपरिपक्व दृष्टिकोन आहे. यात प्रामाणिकपणा कमी आणि कम्युनिकेशनची टाळाटाळ दिसते. पार्टनरला न कळवता त्याच्या छोट्या चुका "हेट लिस्ट" मध्ये जोडणं ही नात्यातील अन्यायकारक गोष्ट आहे.
नातं हेल्दी कसं असतं?
खऱ्या अर्थाने एक चांगलं रिलेशनशिप हे ईमानदारी, विश्वास आणि संवादावर टिकून असतं. "Date Them Till You Hate Them" हे या सगळ्याच्या विरुद्ध आहे.
मुळात खरी हिंमत दाखवणं म्हणजे समस्यांना तोंड देणं, त्यावर बोलणं, संवाद साधणं. जर पार्टनरची सवय त्रासदायक वाटत असेल, तर प्रेमाने आणि शांतपणे त्याच्याशी चर्चा केली पाहिजे. जर चर्चा करून, समजावून किंवा संधी देऊनही काही मार्ग सापडत नसेल तर स्पष्टपणे बोलून नातं संपवणं समजदारी ठरेल.