आईबाबा, जरा धिरानं घ्या! निकालानंतर मुलांशी बोलताना लक्षात ठेवा ५ गोष्टी-इथं चुकलात तर..
Updated:May 5, 2025 19:20 IST2025-05-05T19:14:10+5:302025-05-05T19:20:56+5:30
Remember these 5 things when talking to your children after the results : निकाला नंतर मुलांशी बोलताना काळजी घ्या. पालकांनी लक्षात ठेवायला हव्या या गोष्टी.

दहावी बारावी म्हणजे मुलांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा. मुलांची मनस्थिती या इयत्तांदरम्यान जरा वेगळी असते. ती सांभाळून घेण्याचे काम पालकांचे असते. शिक्षण क्षेत्रात बदल होत असतात. वय वाढत असते त्यामुळे स्वभावात बदल होतात. मुलांच्या बोलण्यातही बदल होतो. अशावेळी त्यांना सावरून घेणे पालकांच्या हातात असते.
अनेकदा मुलांच्या वागण्यामुळे पालकांचा स्वत:वरचा ताबा सुटतो आणि नको ते शब्द उच्चारले जातात. तुमच्यासाठी तात्पुरता असलेला राग मुलांवर मात्र कायमस्वरुपी परिणाम करु शकतो. पालक आणि मुलांच्या नात्यातील अंतर वाढवू शकतो. त्यामुळे मुलांशी बोलताना कोणते शब्द वापरावेत याची काळजी घ्या.
१२वीचा निकाल लागला आहे दहावीचाही लवकरच लागेल. निकालावेळी मुलांपेक्षा पालक जास्त चिंतेत असतात. तुम्हाला काळजी वाटणे जरी सहाजिक असले तरी त्या चिंतेचं मुलांना ओझं होणार नाही याची काळजी घ्या. पालक मुलांना व्यवस्थित ओळखून असतात. आपले पाल्य कितपत हुशार आहे याची जाणीव पालकांना असते. अपेक्षाही त्यानुसारच ठेवणे गरजेचे आहे. मुलांना घाबरवून ठेऊ नका.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांमध्ये तुलना करु नका. ताईला तुझ्यापेक्षा जास्त गुण होते किंवा तुझ्या मित्राला जास्त मिळाले अशी वाक्य मुलांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल मत्सर निर्माण करतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. कोणी गणितात चांगले असते तर कोणी इतिहासात. मात्र सगळ्यांची बौद्धिक क्षमता वेगळी असते. परीक्षेचे गुण जरी महत्त्वाचे असले तरी तुमच्या मुलाचे मानसिक आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे.
मुलांना गुण कमी मिळाल्यावर पालकांना वाईट वाटते आणि ते नैसर्गिक आहे. मात्र पालकांपेक्षा त्या मुलाला जास्त वाईट वाटत असणार हे विसरुन चालणार नाही. मुलांना तुमच्या आधाराची गरज असते. कुठे काय चुकले हे समजवून सांगणे गरजेचेच आहे मात्र त्याची पद्धत चुकता कामा नये.
तसेच ज्या मुलांना जास्त गुण आहेत, त्यांना पुढील भविष्याचा ताण देऊ नका. ओरडताना जसे भान हवे तसेच मुलांचे कौतुक करतानाही असणे गरजेचे आहे. मनामध्ये गर्वाची भावना निर्माण होणार नाही. उर्मटपणा येणार नाही याची काळजी घ्यावी. इतरांना ते कमी लेखायला लागणार नाहीत याची काळजी घ्या.
मुलाच्या पुढच्या वाटचालीचा अंदाज पालक निकाला वरुन लावून टाकतात. मुलाला कमी मार्क मिळाले म्हणजे त्याला कॉलेज चांगले नाही मिळणारपासून चांगली नोकरीही नाही मिळणार इथपर्यंत विचार करतात आणि मुलांनाही ऐकवतात. मात्र तसे काही नसून मुलांना पुढेही अनेक संधी मिळतात हा आत्मविश्वास मुलांना देणे हे पालकांचे काम आहे.
काही पालकांना मुलांना कमी गुण मिळाल्याचे फार वाईट वाटत नाही ते त्या बाबतीत मुलांना सांत्वनही देतात. मुलांना जास्त ओरडत नाहीत. मात्र चारचौघात किंवा मजेत मुलांच्या अपयशावरुन विनोद करतात. मनात काहीच वाईट नसते. मात्र मुलांसाठी ते अपमानकारक ठरते. त्यामुळे असे वागणे पालकांनी टाळायला हवे.