By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:30 IST
1 / 10उत्तर प्रदेशात सध्या प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांत ४० आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, यामध्ये अनेक गाजलेल्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे IAS किंजल सिंह. 2 / 10किंजल सिंह या उत्तर प्रदेश केडरच्या अत्यंत डॅशिंग आणि कर्तव्यदक्ष अधिकारी मानल्या जातात. ५ जानेवारी १९८२ रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. 3 / 10२००८ च्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी देशभरात २५ वा रँक मिळवला होता. बीए, एलएलबी अशा पदव्या त्यांनी घेतल्या आहेत. जरी आज त्या खूप यशस्वी असल्या, तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत वेदनादायी आणि संघर्षाचा आहे.4 / 10किंजल केवळ अडीच महिन्यांच्या होत्या, तेव्हा त्यांचे वडील आणि डीएसपी (DSP) के.पी. सिंह यांची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांच्याच सहकाऱ्यांनी एका फेक एनकाउंटरने केली होती. 5 / 10पतीच्या निधनानंतर आई विभा सिंह यांनी न्यायासाठी मोठा लढा दिला. तब्बल ३१ वर्षे त्या बलियापासून दिल्लीपर्यंत कोर्टाच्या फेऱ्या मारत राहिल्या. मात्र याच काळात २००४ मध्ये आई विभा सिंह यांचा कॅन्सरने मृत्यू झाला.6 / 10आई गेल्यानंतर किंजल आणि त्यांची धाकटी बहीण प्रांजल यांनी खचून न जाता वडिलांना न्याय मिळवून देण्याचा निश्चय केला. दोघींनी यूपीएससीची जोरदार तयारी सुरू केली. 7 / 10२००८ मध्ये किंजल आयएएस (IAS) झाल्या, तर प्रांजल यांनी २५२ वा रँक मिळवून आयआरएस (IRS) पद मिळवलं. या दोघींच्या जिद्दीमुळेच २०१३ मध्ये म्हणजेच ३१ वर्षांनंतर वडिलांच्या हत्येतील १८ आरोपींना शिक्षा झाली.8 / 10किंजल सिंह यांची परिवहन आयुक्त पदावरील कारकीर्द अवघ्या सात महिन्यांची ठरली. या काळात त्यांनी ओव्हरलोडिंग माफियांविरुद्ध कठोर पावलं उचलली आणि अनेक भ्रष्ट कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. मात्र दयाशंकर सिंह यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. 9 / 10लहानपणी वडिलांचे छत्र हरवणं आणि तरुणपणी आईला गमावणं अशा संकटांनंतरही किंजल सिंह डगमगल्या नाहीत. त्यांनी केवळ स्वतःचं करिअर घडवलं नाही, तर आपल्या वडिलांच्या आरोपींना जेलमध्ये पाठवलं.10 / 10आता माध्यमिक शिक्षण विभागाची जबाबदारी किंजल सिंह कशा प्रकारे पार पाडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांची ही यशोगाथा आजही हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.