पावसाळ्यात 'या' भाज्या खाणं म्हणजे आजारांना आमंत्रण; अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी तर चुकूनही खाऊ नये..
Updated:June 20, 2025 16:45 IST2025-06-20T16:40:14+5:302025-06-20T16:45:33+5:30

हिवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं, खाल्लेलं सगळं अंगी लागतं, तसं पावसाळ्यात होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे कित्येक पदार्थ पचत नाही.(avoid these 5 vegetables in monsoon)
ज्या लोकांना नेहमीच ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो, त्यांनी तर त्यांच्या आहाराची पावसाळ्यात थोडी विशेष काळजी घ्यायला हवी. कारण सर्वसामान्य लोकांनाही या दिवसांत कित्येक पदार्थ खाल्ले की पोट जड होणे, ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो.
म्हणूनच आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेला हा सल्ला वाचा आणि पावसाळ्यात काही भाज्या खाणं टाळा. त्यापैकी एक आहे कच्चा कांदा. कांदा हा वातूळ असतो. तो तुम्ही या दिवसांत कच्चा खाल्ला तर शरीरातला वात वाढतो.
कच्च्या कांद्याप्रमाणेच वांगी खाणंही या दिवसांत कमी करावं. कारण वांगीही वातूळ असतात. त्यामुळेही अनेकांना पोटदुखी, पोट जड पडणे, असे त्रास होतो. या कारणामुळेच आपल्याकडे आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास पाळतात त्यात कांदा आणि वांगी खाणं बंद केलं जात.
या दिवसांत हिरव्या पालेभाज्या खातानाही विशेष काळजी घ्यावी. कारण पालेभाज्यांना चिखल, माती लागलेली असते. त्यात अनेक किटाणू, बॅक्टेरिया असतात. जर भाज्या योग्य पद्धतीने स्वच्छ केल्या नाही तर अपचनाचा त्रास होऊ शकतो.
काकडी, बीट, पत्ताकोबी, गाजर असे पदार्थ एरवी आपण कच्चे खातो. पण पावसाळ्यात ते पचायला जड जातात. त्यामुळे ज्यांना नेहमीच अपचन होते, त्यांनी हे सलाड पावसाळ्यात कधीच कच्चे खाऊ नये. तुपामध्ये थोडेसे फ्राय करून खावे.
पावसाळ्याच्या दिवसांत मशरूम खाणेही कमी करावे, असे तज्ज्ञ सांगतात.