डाएट, व्यायाम करुनही वजन कमी होत नाही? 'या' ५ चुका कारणीभूत, एकदा सवयी बदलून पाहा
Updated:January 22, 2026 16:08 IST2026-01-22T15:54:26+5:302026-01-22T16:08:45+5:30
वजन कमी करण्याबाबतची योग्य माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

भारत आणि संपूर्ण जगामध्ये लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. २०२१ च्या आकडेवारीनुसार, भारतात १८ कोटींहून अधिक व्यक्ती ओव्हरवेट होत्या, तर जगभरात ही संख्या १.११ अब्ज इतकी होती.
'युरोपियन सोसायटी ऑफ मेडिसिन'मध्ये ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, हीच गती कायम राहिल्यास २०५० पर्यंत जगातील सुमारे ३.८० अब्ज लोक लठ्ठपणाचे शिकार असतील.
हा आकडा त्या काळातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक असेल. म्हणूनच तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्याबाबतची योग्य माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सकाळचा नाश्ता न करणं
धावपळीच्या आयुष्यात अनेकजण नाश्ता करणं टाळतात. आहारतज्ज्ञांच्या मते, यामुळे मेटाबॉलिझ्मवर वाईट परिणाम होतो. जेवण स्किप केल्याने शरीराचा मेटाबॉलिक रेट कमी होतो आणि नंतर भूक लागल्यावर गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लागते.
नाश्त्यात कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि प्रोटीनचा समावेश करणे फायदेशीर ठरते. खूप जण वजन वाढेल म्हणून नाश्ता करणं टाळतात, पण असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे.
कार्ब्स पूर्णपणे बंद करणं
वजन कमी करण्यासाठी अनेकजण आहारातून कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे काढून टाकतात. पण ही मोठी चूक आहे. कार्ब्स शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळे ते पूर्णपणे बंद करण्याऐवजी 'पोर्शन कंट्रोल'वर लक्ष द्यावं.
डिटॉक्स आणि क्रॅश डाएटचा अतिवापर
सध्या डिटॉक्स टी, क्रॅश डाएट आणि फॅड ड्रिंक्सचा ट्रेंड आहे. आहारतज्ज्ञ असा इशारा देतात की हे उपाय दीर्घकाळासाठी प्रभावी नसतात. यामुळे सुरुवातीला वजन कमी होईलही, पण नंतर पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊन पुन्हा वजन वाढण्याचा धोका असतो.
केवळ कार्डिओवर अवलंबून राहणं
अनेकजण फक्त मॉर्निंग वॉक किंवा कार्डिओ व्यायामालाच प्राधान्य देतात. यामुळे केवळ तात्पुरती कॅलरी बर्न होते. याउलट, 'स्ट्रेंथ ट्रेनिंग'मुळे स्नायूंचे प्रमाण टिकून राहतं आणि मेटाबॉलिज्म सुधारते, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतं.
हेल्दी फूडचे अतिसेवन
एखादा पदार्थ 'हेल्दी' आहे याचा अर्थ तो कितीही प्रमाणात खावा असा होत नाही. एनर्जी बार, पॅकबंद नट्स आणि फ्रूट ज्यूस यांसारख्या पदार्थांचे अतिसेवन नकळत वजन वाढवू शकते.
निरोगी आयुष्यासाठी सकस आहारासोबतच त्याच्या प्रमाणाकडेही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासोबतच आहाराला देखील विशेष महत्त्व आहे.