प्रत्येक पालकाला आपल्या मुलानं डॉक्टर बनावं, वकील बनावं, खूप शिकावं असं वाटत असतं. पण अभ्यासाबरोबरच मुलांना दैनंदिन जीवनातील बेसिक सवयी लावण्याची पालकांची इच्छाशक्ती दिसून येत नाही. बरेच पालक आपल्या मुलांना लाडोबा करून ठेवतात. बेसिक सवयी जसं की आपण जेवल्यानंतर ताट स्वत:उचलणं नंतर विसळून ठेवणं, कपड्यांच्या घड्या घालणं. अंथरूण पांघरूण व्यवस्थित करून ठेवणं, खोलीतला पसारा आवरणं, स्वयंपाकाची तयारी करण्यास मदत करणं, घरातला कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकणं ही कामं फक्त मुलींनीच नाही तर मुलांनीही आवडीनं करायला हवीत. (Tips For Raising Responsible Children Parenting Advice)
घरातल्या मुलांनाही अशी कामं करण्यास प्रवृत्त करणं ही आपली जबाबदारी आहे.मुलं १० ते १२ वर्षांची झाल्यानंतर त्यांनी आपण वापरलेली इनरवेअर्स स्वत:धुवायला हवीत. पालकांचं काम हलकं व्हावं हा यामागचा उद्देश अजिबात नाही. स्वावलंबन, शिस्त आणि स्वत:ची जबाबदारी स्वत:हून घ्यायला हवी ही जाणीव होणं हा या मागचा उद्देश आहे.
मुलांना वेळीच शिस्त न लावण्याचा परिणाम काय होतो?
'आमची मुलं कोणत्याही कामाला धक्का लावत नाहीत, 'असं काही पालक खूप अभिमानानं सांगतात. पुढे अशा प्रवृत्तीच्या लोकांना मुलं झाली तरीही पत्नी किंवा आई-वडीलांवर कामासाठी अवलंबून असतात. जी मुलं लहान असताना आपल्या छोट्या छोट्या कामांची जबाबदारी घेऊ शकत नाही ते मोठे झाल्यानंतरही जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात. पालकांनी नेहमी लक्षात ठेवायलं हवं की माझं मूल, माझं बाळ असं म्हणत मुलांना अति लाडावून ठेवू नये.
पालकांसाठी महत्वाचा सल्ला
मुलं सांगून एखादी गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला बघून जास्त शिकतात. जर तुम्हाला त्यांना वाचनाची सवय लावायची असेल तर आधी तुम्ही पुस्तक हातात घ्या. जेव्हा मुलं एखादी चांगली गोष्ट करतात तेव्हा त्यांचे मनापासून कौतुक करायला विसरू नका. यामुळे त्यांना ती सवय चालू ठेवण्यास प्रोत्साहन मिळते. कोणतीही सवय एका दिवसांत लागत नाही. त्यासाठी सातत्य आणि संयम आवश्यक असतो. लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयी मुलांच्या भविष्यातील यशाचा मार्ग सुखकर करतात.
