Join us

ऑनलाइन अभ्यासाला बसलेली मुलं ‘ढ’ गोळे व्हायला लागलेत? त्यांच्या आहारात हव्याच ४ गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 13:27 IST

कम्प्युटरसमोर तासनतास ऑनलाइन बसल्याने क्षमता असूनही मुलांचा अभ्यासातला रस, एकाग्रता कमी झाल्याचे दिसते. घरात सतत स्क्रीनसमोर बसलेल्या मुलांच्या आहाराकडेही त्यासाठी बारकाईने लक्ष द्यायला हवे.

ठळक मुद्देमुलांना रोज 3-4 आक्रोड रोज खायला द्यावेत.मुलांच्या सकाळच्या पहिल्या आहारात १ चमचा साजूक तूप हवंच.मुलांच्या मेंदूविकासासाठी आहारात नियमित हिरव्या भाज्या असायलाच हव्यात. 

कोरोनाकाळात मुलांनी गेले दीड वर्ष ऑनलाइन अभ्यास केला. आता मात्र ते ऑनलाइन शिक्षणाला कंटाळले आहेत. त्या शाळा सुरु झाल्या म्हणता म्हणता पुन्हा बंद झाल्या, पुन्हा मुलं स्क्रिनसमोर ऑनलाइन बसून लागली.  मुलांचं अभ्यासातलं लक्ष उडालंय, त्यांची एका जागी बसून लिहिण्यावाचण्याची सवय मोडलीये, अभ्यासातील एकाग्रता कमी तर झालीच शिवाय स्मरणशक्तीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. याबाबतीत शक्षणक्षेत्रातले तज्ज्ञ मात्र केवळ शाळा आणि विद्यार्थी यांना दोष न देता काही उपाय पालकांनी आपल्या स्तरावर करण्याचेही सुचवत आहेत.

Image: Google

ऑनलाइन अभ्यासाच्या बाबतीत मुलांना ओरडून, रागवून त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढणार नाही. स्मरणशक्ती ही एक प्रक्रिया आहे. त्यावर ऑनलाइन अभ्यासाचा थोडा परिणाम झाला असेल. पण म्हणून मुलांची स्मरणशक्ती कायमची कमी झाली असं नाही. अभ्यासातली एकाग्रता वाढली तर त्याचा परिणाम स्मरणशक्तीवरही होतो. त्यासाठी मुलांना केवळ अभ्यास, पुस्तकं, इतर शालेय साधनं, औषधं किंवा कोणत्या ॲपसदृश्य साधनांची गरज नाही.  यासाठी त्यांच्या आहारात जाणीवपूर्वक काही गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होईल शिवाय अभ्यासातील, वाचन -लेखनातील गोडीही वाढेल. यासाठी आहारातील ४ घटक खूप मदत करतात. 

Image: Google

1. अक्रोड

अक्रोडमधे ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. हे फॅटी ॲसिड मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचं मानलं जातं. मुलांना नियमित 2-3 अक्रोड खायला दिल्यास त्यांचा मेंदू चांगल्या गतीने  काम करतो. तसेच अक्रोडाचा उपयोग स्मरणशक्ती वाढण्यासाठीही होतो. 

Image: Google

2. हिरव्या पालेभाज्या

हिरव्या भाज्यांमुळे, पालेभाज्यांमुळे स्मरणशक्ती वाढते. हिरव्या भाज्यांमधे के जीवनसत्त्वं, ल्यूटिन, प्रथिनं, फोलेट आणि केरोटीन हे घटक भरपूर प्रमाणात असतात.  हे घटक मेंदुच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. मुलांच्या रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या, पालेभाज्या यांचा समावेश करायलाच हवा. जर मुलांना भाजीच्या स्वरुपात या भाज्या आवडत नसतील तर त्यांना आवडेल त्या सॅण्डविच, थालीपिठ, डोसे या स्वरुपात त्याचा आहारात समावेश करावा. 

Image: Google

3. साजूक तूप

लहान मुलं साजूक तूप खाण्याच्या बाबतीत खूप नाटकं करतात. पण पोषण तज्ज्ञ सांगतात, की सकाळी मुलांच्या पहिल्या आहारात १ चमचा साजूक तूप असायलाच हवं. तुपामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते. 

Image: Google

4.  चिया सीड्स

वेटलाॅसच्या बाबतीत चिया सीडस खूप महत्त्वाच्या आहेत. चिया सीड्समधे ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. ॲण्टिऑक्सिडण्टस मेंदुच्या विकासासाठी फायदेशीर असतात.  जर रोज एक चमचा चिया सीड्स रात्री पाण्यात भिजावाव्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना हे पाणी पिण्यास दिलं तर त्याचा फायदा अभ्यास, वाचन यातील एकाग्रतेवर आणि स्मरणशक्ती वाढण्यावर होतो. 

टॅग्स :पालकत्वअन्नआहार योजना