एखाद्या स्त्रीची ओळख करुन देताना तिच्या नावाआधी कोणत्या घरची सून आहे, वडीलांची नोकरी काय, नवरा काय करतो याची माहिती दिली जातो. (Women Should Live for Themselves Too: 6 Things Every Woman Must Do – Spend on Yourself, Travel Freely, Don’t Hold Back)नंतर वाटलं तर नावाला महत्व. पण खरंच एका स्त्रीची ओळखी तेवढीच मर्यादीत आहे का? आणि खरंच मर्यादीत झाली असेल तर नवी ओळख निर्माण करा.
महिलांच्या आयुष्याची गोष्ट सांगायची झाली तर त्यात जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि त्याग यांची मोठी यादी दिसते. घर, मुलं, नोकरी, कुटुंब सगळं सांभाळताना अनेकदा स्त्री स्वतःलाच मागे ठेवते. हळूहळू ती इतकी जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून जाते की स्वतःची ओळख कुठेतरी हरवते. पण खरं सांगायचं तर जबाबदारी म्हणजेच आपलं संपूर्ण आयुष्य असं कधीच नसतं.
सगळ्यात आधी महिलांनी स्वाभिमान जपायला शिकायला हवं. प्रत्येक गोष्ट सहन करणं, प्रत्येक वेळी गप्प राहणं आणि स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं याला त्याग किंवा स्त्रीकर्तव्य म्हणणं फारच वाईट आहे. स्वतःची किंमत ओळखणं आणि आपलं मत ठामपणे मांडणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे.
तसंच स्वतःची ओळख जपणंही गरजेचं आहे. 'ती अमुकची आई, अमुकची बायको किंवा तमुक घरची सून' एवढ्यापुरतीच ओळख मर्यादित असावी का? त्या आधी ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिची स्वतःची स्वप्नं आहेत, आवडी-निवडी आहेत. त्या जिवंत ठेवणं म्हणजेच स्वतःला जपणं.
अनेक वेळा समाजाकडून किंवा आसपासच्या लोकांकडून टोमणेही ऐकावे लागतात. "स्वतःसाठी वेळ काढते", "इतका स्वतःवर खर्च कशाला?" असे प्रश्न विचारले जातात. पण प्रत्येक वेळी त्या टोमण्यांचा विचार करत बसलो तर आयुष्य कधीच आपलं राहणार नाही. कधी कधी त्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करणंही शिकावं लागतं.
महिलांनी स्वतःवर खर्च करण्याची सवयही लावली पाहिजे. स्वतःसाठी एखादी छोटी गोष्ट घेणं, आवडत्या गोष्टींवर पैसे खर्च करणं किंवा स्वतःला वेळ देणं यात काहीच चुकीचं नाही. आयुष्यभर इतरांसाठीच सगळं करत राहणं आणि स्वतःला सतत थांबवणं हे योग्य नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला हरवू देऊ नका. कुटुंब, जबाबदाऱ्या आणि नाती महत्त्वाची आहेतच, पण त्या सांभाळताना स्वतःचं अस्तित्व, स्वप्नं आणि आनंदही तितकाच महत्त्वाचा आहे. स्वाभिमान जपा, स्वतःची ओळख जपा, टोमण्यांना जास्त महत्त्व देऊ नका आणि आयुष्य जगताना स्वतःलाही त्यात जागा द्या. कारण स्वतःसाठी जगणं ही स्वार्थी गोष्ट नाही, तीच खऱ्या अर्थाने आयुष्याची जाणीव आहे.
