सगळ्या जगाने त्याला शिव्या घातल्या, अगदी पाकिस्तानीही त्याला स्लॉगर म्हणत होते. करिअर संपलं त्याचं म्हणाले. सोशल मीडियात तर इतकं ट्रोलिंग झालं की अपमानानं पाणी पाणी व्हावं. अर्थात अभिषेक शर्माचीही टी ट्वेण्टी वर्ल्डकपची गोष्ट. तीनदा तो शून्यावर बाद झाला, रन होत नव्हते. टेंशन वाढत होतं. (Why Abhishek Sharma deleted social media? social media is worst for self confidence )शेवटच्या सामन्यात त्याला सूर गवसला. त्याविषयी अभिषेक सांगतो की मला प्रशिक्षक गौतम गंभीर, कप्तान सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, पहिले तुझ्या फोनमधून सोशल मीडिया ॲप्स सगळे डिलिट कर!
अभिषेकने ते ऐकलं आणि रिझल्ट आपल्यासमोर आहे. आपण सगळेच सोशल मीडियात इतके वाहून जातो आहोत की कोण कुणाला काय म्हणाले यातच आपली ताकद संपते. लाइकलव्हचे टिळे आणि ट्रोलिंग दोन टोकावर आपण सगळे जगू लागलो आहोत. सोशल मिडिया आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आपण काय खातो, कुठे फिरतो, काय विचार करतो हे सर्व काही सोशल मिडियावर शेअर केलं जातं. पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते ती म्हणजे पोस्टखाली येणाऱ्या कमेंट्सचा आपल्या मानसिकतेवर होणारा परिणाम.
सोशल मिडियावरील कमेंट्स या दोन टोकांच्या असतात. काही कमेंट्स कौतुक करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या असतात, तर काही टीका करणाऱ्या, टोमणे मारणाऱ्या किंवा अगदी दुखावणाऱ्याही असतात. सकारात्मक कमेंट्समुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, काम करण्याची प्रेरणा मिळते आणि स्वतःबद्दल चांगलं वाटतं. मात्र नकारात्मक कमेंट्सचा परिणाम याच्या अगदी उलट होतो. सतत टीका, ट्रोलिंग किंवा अपमानास्पद प्रतिक्रिया मिळाल्यास व्यक्ती तणावाखाली येऊ शकते, आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि काही वेळा मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
विशेषतः तरुण पिढीवर याचा अधिक प्रभाव पडताना दिसतो. लाईक्स आणि कमेंट्स यावर स्वतःची किंमत ठरवण्याची सवय लागते, जी धोकादायक ठरू शकते. एखाद्या पोस्टला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास निराशा, असुरक्षितता आणि स्वतःबद्दल शंका निर्माण होऊ शकते. काही वेळा लोक इतरांच्या मतांना इतकं महत्त्व देतात की स्वतःची ओळख आणि विचार हरवून बसतात.
सोशल मिडियावर येणारे मिम्स पाहून आपण हसतो खरे पण त्यातील माणसांवर त्या गोष्टीचा काय परिणाम होत असेल याचा विचार आपण करतच नाही. लोकं आपल्यावर हसतात किंवा आपल्याला कमी लेखतात ही भावना आत्मविश्वास मुळापासून नष्ट करुन टाकते. सोशल मिडियावर एखादी व्यक्ती ट्रोल व्हायला एवढी घाबरते की अगदी आत्महत्येपर्यंत विषय जातात. अशा अनेक घटना आपण ऐकत असतो, पाहत असतो. वाढत चाललेलं ट्रोलिंग कल्चर समाजासाठी चांगलं नाही. सोशल मिडिया एखाद्याला स्टार करते तर एखाद्याचे आयुष्य उद्वस्त. त्यामुळे आपण काय कमेंट करतो याचा विचार करणं फार गरजेचं आहे.
