आपलं ध्येय निश्चत असेल आणि आपण त्यासाठी खूप कष्ट करत असू तर प्रत्येक स्वप्न साकार होतं. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका मार्काने नापास झाल्याने अनेकांना वाईट वाटतं, ते रडत बसतात. पुन्हा प्रयत्न करायचं सोडून देतात. पण मृदुपाणी नंबी ही तरुणी यामुळे खचली नाही. एका मार्कने नापास झाल्यावर तिने पुन्हा नवीन सुरुवात केली.
मृदुपाणी UPSC प्रिलिम्समध्ये पहिल्या प्रयत्नात फक्त एका मार्काने नापास झाल्यानंतर तिने हार मानली नाही, रडत बसली नाही तर तिने स्वतःला एक वचन दिलं - आता लक्ष फक्त ध्येयावर असेल असं म्हटलं. तिने स्वतःला फोनपासून दूर ठेवलं, लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहिली आणि मग मृदुपाणीने दुसऱ्या प्रयत्नात UPSC IES मध्ये ऑल इंडिया रँक २१ मिळवून इतिहास रचला.
२०२० मध्ये मृदुपाणीने पहिल्यांदाच IES परीक्षा दिली, पण ती फक्त १ मार्काने प्रिलिम्स उत्तीर्ण होऊ शकली नाही. हा तिच्यासाठी एक खूप मोठा धक्का होता, पण तिने ती आपली कमजोरी बनू दिली नाही. तिने फोनचा वापर करणं पूर्णपणे बंद केलं आणि अभ्यासाला जोमाने सुरुवात केली. आता तिला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं.
मृदुपाणीने पुन्हा पूर्ण मेहनत आणि समर्पणाने तयारी सुरू केली. २०२२ मध्ये ती पुन्हा परीक्षेला बसली आणि यावेळी तिने ऑल इंडिया रँक २१ मिळवला. कम्युनिकेशन मंत्रालयात आयईएस अधिकारी म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली.
हैदराबादच्या जी. नारायणम्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मृदुपाणीने बी.टेक केलं. तिने इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतून पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असताना ती यूपीएससीकडे वळली आणि आयईएसला हे तिचं ध्येय बनवलं. मृदुपाणीपासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.