सायना नेहवालचा जन्म झाला, तेव्हा तिची आजी जवळपास महिनाभर तिला पाहायलाही गेली नव्हती. घरात अनेकांच्या मनात एकच खंत होती, मुलगा हवा होता, मुलगीच झाली. त्या काळातच काय आजही भारतात अनेक घरात मुलींच्या जन्माचा आनंद होत नाही. पण सायनाने हे सिध्द केलं की ज्या मुलीला घरातल्यांनीही जन्मत:च नाकारले, तिने पुढे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. सायनाच्या आई-वडिलांनीही लेकीला जुनाट वातावरणापासून लांब ठेवत भक्कम साथ दिली आणि त्याच लेकीनं इतिहास घडवला. सायनानं निवृत्ती जाहिर केली असली तरी तिची कामगिरी प्रेरणादायीच आहे.
आज भारतात अनेक मुली बॅडमिंटन खेळत असल्या तरी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचणं तिथं यश मिळवणं सोपं नव्हतं त्याकाळात सायना मैदानात उतरली.
हरियाणातील हिसार येथे जन्मलेली सायना, लहान वयातच हैदराबादला आली. तिचे वडील तिथं नोकरी करत. मर्यादित सुविधा, रोजचा कठोर सराव आणि प्रचंड शिस्त या सगळ्यांतून तिचा खेळ घडत गेला. पुलेला गोपीचंद तिचे गुरु, त्यांच्या कडक शिस्तीत रोज पहाटे उठून सराव करत तिनं आपलं स्वप्न सत्यात उतरवण्याचा ध्यास घेतला.
२०१२ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनसाठी पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला ठरली. त्या काळात भारतीय महिला खेळाडूंचे सामने टीव्हीवर दाखवावेत की नाही, याबाबतही उदासीनता होती. पण सायनाच्या त्या एका पदकाने देशाचे लक्ष महिलांच्या बॅडमिंटनकडे वळवले. यानंतर सायनाने सातत्याने जागतिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. अपयश, दुखापती आणि प्रचंड मानसिक ताण असूनही ती कधीही मैदान सोडून पळाली नाही. २०१५ मध्ये जागतिक क्रमवारीत क्रमांक १ मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. हा केवळ वैयक्तिक सन्मान नव्हता, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण होता. तिच्या यशानंतर भारतात महिला बॅडमिंटनपट्टूंची एक नवी पिढी तयार होऊ लागली.
सायनाच्या वाट्याला यशासोबत टीकाही आली. दुखापतींमुळे आलेली घसरण, वैयक्तिक आयुष्याविषयीच्या चर्चा, सोशल मीडियावरील दबाव, गोपीचंद यांच्याशी झालेले मतभेद यासाऱ्यातही ती खेळत होती. तिची हिंमत कमी झाली नाही.काही गोष्टी चुकल्या, काही उत्तम झाल्या पण हे नक्की सायना नेहवालने हजारो मुलींसाठी बॅडमिंटनच्या कोर्टची वाट सोपी केली.
