मदर्स डे निमित्त एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. कॉन्स्टेबल ज्योती तिवारी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेकडो निरागस मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे. आर्थिक परिस्थिती, सामाजिक दबाव आणि नाईलाजमुळे ज्या मुलींचं कमी वयात लग्न लावून दिलं जात होतं असे बालविवाह रोखण्यासाठी ज्योती तिवारी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष करत आहेत.
५०० हून अधिक बालविवाह थांबवले
ज्योती तिवारी यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक बालविवाह थांबवले आहेत. तसेच २०० हून अधिक मुलांना बालमजुरीच्या दलदलीतून बाहेर काढून त्यांना पुन्हा शाळेत पाठवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. याच कारणामुळे ज्या मुलांचं बालपण आणि भविष्य ज्योती यांच्या प्रयत्नांमुळे सुरक्षित झालं, ती मुले आज त्यांना आईचा दर्जा देतात.
२०० हून अधिक मुलांची बालमजुरीतून सुटका
ज्योती तिवारी सांगतात की, जेव्हा त्या बालमजुरी करणाऱ्या मुलांची सुटका करायच्या, तेव्हा त्यांच्या वेदनादायक गोष्टी ऐकून मन हेलावून जायचं. एखादं मूल वडिलांच्या निधनानंतर कुटुंब चालवण्यासाठी मजुरी करत होतं, तर कोणी अनाथ असल्यामुळे स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करत होतं. अनेक मुलं हॉटेल, ढाबे आणि कारखान्यांमध्ये काम करताना आढळली. अशा मुलांची सुटका करून त्यांनी केवळ त्यांना बालमजुरीतून मुक्त केलं नाही, तर त्यांचा शाळांमध्ये एडमिशनही करून दिलं.
ग्रामस्थांचा विरोध आणि हल्ल्यांचा सामना
ज्योती सांगतात की, आजही त्या या मुलांची वेळोवेळी भेट घेत असतात. मुलं त्यांना आईसारखा सन्मान आणि प्रेम देतात, तर ज्योती देखील या मुलांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करतात. जेव्हा ही मुलं शिकून पुढे जातात, तेव्हा त्यांना सर्वाधिक आनंद मिळतो. बालविवाह रोखणं ज्योती तिवारी यांच्यासाठी कधीच सोपं नव्हतं. अनेकदा दुर्गम गावांमधून रात्री उशिरा बालविवाहाची माहिती मिळत असे. अशा परिस्थितीत त्या आपल्या टीमसह मध्यरात्री गावात पोहोचायच्या. अनेक प्रकरणांमध्ये त्यांना ग्रामस्थांचा विरोध आणि हल्ल्यांचाही सामना करावा लागला.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
ज्योती यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले झाले, पण त्या कधीही मागे हटल्या नाहीत. कोणताही निरागस जीव कमी वयात लग्नाच्या बेडीत अडकून स्वतःचं भविष्य खराब करू नये, हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. त्यांचं शौर्य आणि उत्कृष्ट कार्य पाहून पोलीस विभागाने त्यांना सर्वोच्च अशा "रुस्तम जी पुरस्कारा"ने सन्मानित केलं आहे. हा सन्मान त्यांच्या संघर्षाचं, समर्पणाचं आणि सेवाभावाचं प्रतीक मानला जातो.
२००३ मध्ये पोलीस दलात निवड
ज्योती तिवारी या मूळच्या दमोह जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या चार भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना ज्योती म्हणतात की, त्यांच्या घरामागील झोपडपट्टीत राहणारी लहान मुलं मजुरी करायला जायची आणि काही मुले भीक मागायची. त्या निरागस मुलांची अवस्था पाहून त्यांना खूप वेदना व्हायच्या. तेव्हाच त्यांच्या मनात विचार आला की, मोठं झाल्यावर त्यांना अशा मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. याच संकल्पासह त्यांनी पोलीस दलात जाण्याची तयारी सुरू केली.
मुलांच्या हक्कांसाठी सातत्याने काम
२००३ मध्ये त्यांची पोलीस विभागात निवड झाली. नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या 'विशेष किशोर पोलीस पथका'मध्ये (SJPU) काम सुरू केलं आणि तेव्हापासून त्या मुलांच्या हक्कांसाठी सातत्याने काम करत आहेत. ज्योती तिवारी यांना दोन मुलं आहेत आणि ती आपल्या आईच्या कामामुळे अत्यंत प्रभावित आहेत. ज्योती म्हणतात की, कुटुंबाच्या सहकार्याशिवाय हे सर्व शक्य नव्हते. जर समाज आणि प्रशासन यांनी मिळून प्रयत्न केले, तर बालविवाह आणि बालमजुरी यांसारख्या सामाजिक अनिष्ट प्रथा पूर्णपणे नष्ट केल्या जाऊ शकतात.