Join us  

त्यांचे ४०० आणि माझे ४०० रुपये, ८०० रुपयांत लग्न - सुधा मूर्ती सांगतात लग्न ठरवलं पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2024 12:59 PM

Know how Sudha murthy and narayan Murthy Manage their Wedding in Only 800 Rupees : ठरवलं तर साधेपणातही सगळं होऊ शकतं याचं मूर्तीमंत उदाहरण...

लग्न म्हटलं की मोठा तामझाम असे सध्याचे वातावरण. संगीत, मेहंदी, हळद पासून आठवडाभराचे कार्यक्रम आणि डेकोरेशन, कपडे, खाण्या पिण्याची रेलचेल यांवर खर्च केले जाणारे लाखो रुपये. हे चित्र अगदी सर्रास दिसते. एकदाच लग्न करत असल्याने सगळी हौस पूर्ण व्हायला हवी म्हणून अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. पण या सगळ्याची खरंच गरज असते का हा विचार आपल्या मनात येतही नाही. मुलगा आणि मुलगी यांना एकत्र आणण्यासाठी केला जाणारा हा सोहळा म्हणजे सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात अनेकांसाठी एकप्रकारचा दिखावाच असतो.  पण आपल्या जीवनमूल्यांसाठी आदर्श असलेल्या आणि प्रसिद्ध लेखिका असलेल्या सुधा मूर्ती आणि उद्योगपती नारायण मूर्ती यांनी त्यांचे लग्न केवळ ८०० रुपयांत केल्याचे नुकतेच सांगितले (Know how Sudha murthy and narayan Murthy Manage their Wedding in Only 800 Rupees).

या दोघांच्या अनोख्या नात्यावर An Uncommon Love: The Early Life of Sudha and Narayana Murthy  हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यानिमित्त 'सीएनबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत सुधा आणि नारायण मूर्ती यांनी आपल्या लग्नाची गोष्ट सांगितली. सुधा मूर्ती म्हणतात, " लग्नाला येणाऱ्यांसाठी हा एक दिवसाचा इव्हेंट असतो. पण ज्यांचे लग्न होते त्या दोघांसाठी ती आयुष्यभरासाठीची कमिटमेंट असते. आम्हाला दोघांनाही साधेपणा आवडत असल्याने आम्ही लग्नही खूप साध्या पद्धतीने करायचे ठरवले. त्यावेळी मूर्ती यांनी ४०० रुपये आणि मी ४०० रुपये अशा एकूण ८०० रुपयांत लग्न केले. आपल्या या लग्नाला फक्त आपले बहिण भाऊ आणि मूर्ती यांचे बहिण भाऊ इतकेच लोक असतील असे आम्ही ठरवले.”   

(Image : Google)

माझ्या पिढीतील माझ्या वडिलांच्या कुटुंबातील माझे पहिलेच लग्न असल्याने माझ्या वडिलांना ते मोठे करायचे होते. तसेच ते डॉक्टर आणि प्राध्यापक असल्याने हुबळीतील जवळपास प्रत्येक कुटुंबात एकतर त्यांचे रुग्ण होते नाहीतर त्यांचे विद्यार्थी होते. त्यामुळे हुबळीसारख्या ठिकाणी अशाप्रकारे ८-१० लोकांमध्ये लग्न केलं तर लोकं नावं ठेवतील असे वडिलांचे म्हणणे होते.  पण मोठ्या लग्नसोहळ्याला आमच्या दोघांची तयारी नसल्याने ते काहीसे नाराज झाले. पुढचा प्रश्न होता हुबळीत नाही तर लग्न कुठे करायचं? त्यावेळी मूर्ती यांच्या आईने बँगलोरमध्ये त्यांच्या घरी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि आम्हाला दोघांना हवे तसे कमीत कमी लोकांत, कमीत कमी खर्चात आमचे लग्न झाले. त्यावेळी माझ्या घरातून ६ ते ७ आणि मूर्ती यांच्या घरातील ४ ते ५ असे लग्नाला केवळ १० ते १२ जण उपस्थित होते. 

मूर्तींनी मंगळसूत्रासाठी दिले ३०० रुपये...

(Image : Google)

नारायण मूर्ती यांनी सुधा यांना त्यावेळी ३०० रुपये दिले आणि तुला साडी किंवा मंगळसूत्र काय हवे ते आण असे सांगितले. साडी दिर्घकाळ आपल्या सोबत राहणार नाही. पण मंगळसूत्र कायम आपल्या सोबत राहील. त्यामुळे आपण मंगळसूत्र घ्यायचे असे मी ठरवले. त्यावेळी त्या रकमेत एका धाग्यात ओवलेल्या काळ्या मण्यांचे मंगळसूत्र मी आणले. आमचं लग्न अवघ्या अर्धा तासात झालं तर घराजवळच्या राघवेंद्र स्वामी मंदिरात आम्ही जेवणासाठी गेल्याची आठवण नारायण मूर्ती यांनी सांगितली. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसुधा मूर्तीनारायण मूर्तीलग्न