Join us

..‘इतक्या लवकर बाळ नको होतं, लग्नानंतर लगेच दिवस राहिले!’ गर्भनिरोधक न वापरणाऱ्या जोडप्यांची गंभीर समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 18:27 IST

world health day 2025 special article 1 : शहरातील, काही सुशिक्षित जोडपीदेखील, 'आपल्याला, गर्भधारणा कधी हवी आहे ' याचा फारसा विचार न करता कामजीवनाचा आनंद घेतात. गर्भनिरोधकही वापरत नाहीत आणि मग नवे प्रश्न समोर येतात. (World Health Day 2025: Healthy Beginnings, Hopeful Futures.)

ठळक मुद्दे गर्भधारणेचं पूर्व नियोजन आवश्यक. प्रसन्न मनाने, आपल्याला जेंव्हा हवं आहे तेंव्हा अपत्यजन्म झाल्यास आई आणि बाळ सुरक्षित रहातील.

डॉ. किशोर अतनूरकर (स्त्री रोग, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि समुपदेशक)

आपल्या समाजात कामजीवनाचा आनंद न घेताच अनेक महिला गर्भवती होतात. बऱ्याच नवदांपत्यांची एकमेकांशी ओळख फक्त शारीरिक स्तरावरचच होते. मानसिक स्तरावर ओळख होण्यापूर्वी, पती-पत्नीचं नातं काय असतं हे समजण्याच्या आत, सासरच्या मंडळींचा नीट परिचय होण्यापूर्वीच ती गर्भवती होते. ही परिस्थिती बदलली पाहिजे. ती नववधू किंवा विवाहित स्त्री मनाने ' आई ' होण्यास तयार आहे का नाही याबद्दल पती-पत्नी मध्ये बऱ्याचदा संवाद होत नाही.

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर गर्भधारणा राहू शकते याची कल्पना दोघांनाही नसते असं नाही, पण सेक्सचा अनुभव घेण्याची ' उत्तेजना ' इतकी जबरदस्त असते की संभोगानंतर गर्भधारणा राहू शकते, आपण काहीतरी ' काळजी ' घेतली पाहिजे, काहीतरी ' साधन ' वापरलं पाहिजे याचं भान रहात नाही. असं लक्षात आलंय की बऱ्याच नवविवाहित स्त्रियांशी बोलताना त्यांचा ' आपण नवऱ्याशी याबाबतीत कसं बोलावं ' हा संकोच कारणीभूत ठरतो. ती बोलणार नसेल आणि हा ' थांबणार ' नसेल तर नको ते होण्याची शक्यता जास्त. सर्वसाधारणपणे अशी परिस्थिती ग्रामीण भागातील नवविवाहित जोडप्यांच्या बाबतीत आढळते. शहरातील, काही सुशिक्षित जोडपी देखील, 'आपल्याला, गर्भधारणा कधी हवी आहे' याचा फारसा विचार न करता कामजीवनाचा आनंद घेतात. 

पाळी चुकल्यानंतर, जेंव्हा लघवीची तपासणी ' कीट ' वर केली जाते तेंव्हा गर्भधारणा असल्याचं लक्षात येतं. ' आम्हाला तर इतक्या लवकर गर्भधारणा नको होती ' असं म्हणत, ही गर्भधारणा वाढवायची का गर्भपात करून घ्यायचा या द्विधा मनःस्तिथीत अडकलेली, सुशिक्षित जोडपी डॉक्टरकडे येतात, तेंव्हा पंचाईत होते. डॉक्टरांशी सल्लामसलत झाल्यानंतर, दोन्हीपैकी एक निर्णय होतो. ' जे काही झालं ते झालं, आता राहिलेला गर्भ कशाला पाडायचा, पुन्हा नाही राहिला तर ? कधी ना कधी बाळ तर पाहिजेच ना? ' अशी चर्चा होऊन बहुतेक वेळेस गर्भ वाढवण्याचा निर्णय घेतला जातो. मनाने ' ती ' तयार नसताना, नाखुशीनेच ती ' हो ' म्हणते. नऊ महिने ती एका दडपणाखाली असते. म्हटलं तर बाळ होणार म्हणून आनंदी, म्हटलं तर करिअरची वाट लागणार म्हणून अस्वस्थ. अशा विचित्र अवस्थेत गर्भ वाढवून बाळाला जन्म देण्यापेक्षा जर ' पहिल्या रात्री ' याबाबतीत संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती. 

यासाठी गर्भधारणेचं पूर्व नियोजन करणं आवश्यक होतं. प्रसन्न मनाने, आपल्याला जेंव्हा हवं आहे तेंव्हा अपत्यजन्म झाल्यास आई आणि बाळ सुरक्षित रहातील.

गर्भधारणेचं पूर्व नियोजन कसं करायचं? त्याविषयी वाचा पुढच्या लेखात..

(लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. MD OBGY, Ph D. Social Sciences, MS counseling & Psychotherapy) atnurkarkishore@gmail.com Mob : 9823125637 

टॅग्स : प्रेग्नंसीआरोग्यगर्भवती महिलामहिलामहिला आणि बालविकासपरिवार