वैद्य राजश्री कुलकर्णी (M. D. आयुर्वेद )
पुरुष आणि स्त्रिया यांच्या मूलभूत रचनेमध्ये निसर्गानेच खूप फरक केला आहे. वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षापर्यंत साधारण सारखेच वाटणारे मुलं आणि मुली नंतर एक दोन वर्षात अगदी बदलून जातात. मुली वयात येतात, त्यांची मासिक पाळी सुरु होते.(Menopause Awareness Week) खूप जाणवतील इतपत शारीरिक व मानसिक बदल घडतात. हळूहळू सौंदर्यवती स्त्री मध्ये तिचं परिवर्तन होतं.(Menopause diet plan 2026) पुढे याच मुलींची लग्न होतात, त्यांना मुलं बाळं होतात आणि त्यांच्या संगोपनात व स्वतःचं करिअर घडवण्यात तिच्या आयुष्याचा खूप उमेदीचा आणि दीर्घ असा काळ निघून जातो.(Ayurvedic nutrition for hormonal balance) बघताना किंवा वाचताना या सगळ्या फेजेस सोप्या वाटतात परंतु या प्रत्येक स्थितीत स्त्रीच्या आयुष्यात घडणारे शारीरिक बदल आणि त्यानुसार तिच्या आहारविषयक गरजा खूप वेगळ्या असतात. तरी मासिक पाळी सुरु झाल्यापासून मेनोपॉज येईपर्यंत होणारी परिवर्तने स्त्री खूप चांगल्या पद्धतीने हाताळते. कारण तोपर्यंत तिच्या शरीरातील विविध संप्रेरके तिचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करत असतात. आयुर्वेदनुसार सांगायचं झालं तर पित्त दोष शरीरातील तारुण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी समर्थ असतो. परंतु रजोनिवृत्ती झाली की शरीरातील बदल खूप जलद आणि मोठया प्रमाणावर घडतात. शरीरात वात दोष प्राधान्याने काम करु लागतो व झीज होण्याची किंवा डीजनरेशची प्रक्रिया वेगाने सुरु होते.
शरीरात काय बदल होतात? १. मोठया प्रमाणावर थकवा जाणवणे, फार काही काम केलं नाही तरी गळून जाणे, उत्साह नसणे, खूप उदास वाटणे, उगीच चिडचिड होणे, विसर पडणे अशी वेगवेगळी शारीरिक व मानसिक लक्षणे दिसतात. हाडांची झीज होऊ लागते त्यामुळे हाडे मोडण्याची शक्यता बळावते. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात, केस पातळ होतात व गळू लागतात. २.शरीरात सगळीकडे कोरडेपणा निर्माण होतो. तो अगदी त्वचेवर जसा जाणवतो तसा आतड्यांमध्येही येतो, कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणे ही तक्रार उद्भवते. ३. योनीमार्गात कोरडेपणा, खाज, आग होणे ही लक्षणे दिसतात. ४. खरं तर रजोनिवृत्ती ही प्रत्येक स्त्रीच्या साधारण पन्नाशीत होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्याचा कमी अधिक प्रमाणात त्रास मात्र प्रत्येक स्त्रीला जाणवतो. ५. आहार आणि व्यायाम या घरच्या घरी करता येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची काळजी जरी नीट घेतली तरी हा त्रास कमी करता येतो. ६. पाळी अनियमित होणे, कमी जास्त प्रमाणात अंगावर जाणे अशी लक्षणे दिसू लागतात. अशावेळी योग्य आहार हे सारे त्रास कमी करण्यासाठी मदत करतो.
आहार कसा हवा? १. सर्वात पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी या वयोगटातील स्त्रियांनी समजून घेणं गरजेचं आहे. शरीरात घडणाऱ्या संप्रेरकांच्या बदलामुळे या वयात चयापचय क्रिया किंवा मेटोपॉलिझम स्लो होतं व त्यामुळे बहुतेक स्त्रियांमध्ये वजन वाढू लागतं. विशेषतः ओटीपोटावर चरबी साठू लागते. त्यामुळे बऱ्याच जणी वजन नियंत्रणात आणण्यासाठी डाएट सुरु करतात. अमुक खायचं, तमुक नाही असं काहीतरी…पण नुसतं असं केल्यामुळे वजन कमी होतच असं नाही. उलट शरीराची पोषणाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार आहार घ्यायला हवा. २. आधी सांगितल्याप्रमाणे शरीरात रुक्षता, कोरडेपणा वाढत असतो त्यामुळे स्नीग्ध पदार्थांची गरज असते पण ते हेल्दी हवेत. गायीचे तूप जेवणात नक्की घ्यावे, त्या ऐवजी तळलेले पदार्थ बंद करावेत. ३. सर्व प्रकारचा सुका मेवा, त्यातही अक्रोड, बदाम, पिस्ते, खजूर, सुके अंजीर इतकेच नव्हे तर रोजच्या वापरातील खोबरं, तीळ, शेंगदाणे यांचाही वापर करता येतो. फक्त त्याचं प्रमाण अर्थातच नियंत्रित हवं. चांगलं म्हणून कितीही खाल्लं तर कसं चालेल? ४. सांधे दुखत असतील किंवा चालताना, उठता बसताना कुरकुरत असतील तर सकाळी उपाशीपोटी एक मध्यम आकाराचा चमचा भरुन खोबरेल तेल ( शुद्ध लाकडी घाण्यावर काढून आणलेले ) एक कप गरम दुधात घालून प्यावे. ५. पोट साफ व्हावे तसेच शरीराला विषार मुक्त करता यावे यासाठी कच्च्या भाज्या, सॅलड्स, कोशिंबीरी यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा. ६. सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या आलटून पालटून वापराव्यात. स्वंयपाकात लसूण अवश्य घ्यावा. तीळ, खोबरं, शेंगदाणे यांची लसूण घालून चटणी करता येईल. ७. धान्ये वापरताना फक्त गहू व तांदूळ ही मुख्य धान्ये न ठेवता ज्वारी, बाजरी, नाचणी यांचाही वापर करावा. ८. सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये यांचा थोड्या प्रमाणात वापर करावा म्हणजे जेवणात एक तरी उसळ किंवा डाळ असावी, फक्त ती तेल अथवा तूप याची फोडणी देऊनच वापरावी म्हणजे शरीरात कोरडेपणा वाढत नाही आणि त्यांचवेळी चांगली प्रथिने देखील मिळतात. ९. दूध, दही व तूप या दुग्धजन्य पदार्थांचा वापर अवश्य करावा. दही रात्री खाऊ नये. त्याचे प्रमाणही कमीच असावे. १०. साखर, मीठ, गोडाचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ कमीतकमी खावेत. ११. अळशीच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया, कलिंगडाच्या बिया, लाल भोपळ्याच्या बिया, तीळ, खोबरं असं भाजून जेवणानंतर एक चमचा चावून खावे, यामुळे दात व हिरड्या बळकट राहण्यास मदत होते. तसेच हाडांची झीज कमी होते. मधुमेह इ. त्रास नसल्यास खारीक, खोबरं, सुका मेवा, तूप घालून केलेले लाडू हाडांचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी उत्तम! ११. त्या त्या ऋतूत येणारी सगळी ताजी फळं अवश्य खावीत. फळांचा रस काढण्यापेक्षा पूर्ण फळं तीही दाताने तोडून चावून खावीत. तहान लागेल त्यानुसार आपापल्या गरजेनुसार व ऋतू नुसार पाणी प्यावे. खूप कमी किंवा अति प्रमाणात नको. १२. रजोनिवृत्ती होते तेव्हा शरीरातील इस्ट्रोजेन नावाचे संप्रेरक कमी होत असते. सर्व प्रकारच्या बेरीज मध्ये ते भरपूर मिळते, जसे स्ट्रॉबेरीज, रास्पबेरीज, ब्लू बेरीज वगैरे…आपल्याकडे तुती मिळतात व स्ट्रॉबेरीज मिळतात त्या खाऊ शकता. १३. पालक, सर्व शेंगा वर्गीय भाज्या, गाजर, मिळत असल्यास ब्रॉकोली या भाज्या समाविष्ट कराव्यात. १४/ चांगला, सकस व ताजा आहार, त्या बरोबर योग्य तो व योग्य तेवढा व्यायाम आणि चांगली गाढ झोप ही त्रिसूत्री पाळल्यास मेनोपॉज कटकटीचा न होता शांतपणे नैसर्गिक होणारा शारीरिक बदल म्हणून स्वीकारणे सोपे होईल, नाही का?
rajashree.abhay@gmail.com
Web Summary : Menopause brings hormonal changes, slowing metabolism. Focus on nutritious foods like ghee, nuts, and seasonal fruits. Include fiber-rich vegetables and whole grains. Prioritize sleep, exercise, and avoid processed foods for a smoother transition.
Web Summary : रजोनिवृत्ति हार्मोनल बदलाव लाता है, चयापचय धीमा होता है। घी, नट्स और मौसमी फलों जैसे पौष्टिक खाद्य पदार्थों पर ध्यान दें। फाइबर युक्त सब्जियां और साबुत अनाज शामिल करें। बेहतर बदलाव के लिए नींद, व्यायाम को प्राथमिकता दें और प्रसंस्कृत खाद्य पदार्थों से बचें।