डॉ. प्रिया प्रभू (सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज)
कॅन्सर हा शब्द उच्चारला की आपल्या जवळच्या किंवा दूरच्या नातेवाइकांमध्ये किंवा परिचितांमधील ज्या कोणाचा मृत्यू कॅन्सरने झालेला असतो, त्यांचे चेहरे डोळ्यांसमोर येतात. ‘‘कॅन्सर’’ हे निदान त्यासोबत भीती, चिंता, खर्च, धावपळ आणि खालावणारी प्रकृती घेऊन येते. कॅन्सरच्या निदानानंतर फक्त रुग्णाचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलते. मात्र हे सर्व चित्र बदलू शकते, जर कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झाले तर..!
लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे, कारण कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उपचाराचे पर्याय तसेच उपचारानंतर मिळणाऱ्या आयुष्याची प्रतवारी देखील चांगली असते. तरीदेखील असे दिसून येते की, स्त्रियांमधील कॅन्सरचे निदान सहसा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यामध्ये होते. आणि केवळ निदान उशिरा झाले म्हणून स्त्रियांमध्ये कॅन्सरच्या मृत्यूचा धोका वाढतो.
आपण भारताचे चित्र बघितले तर पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील पहिल्या पाच क्रमांकाचे कॅन्सर वेगवेगळे आहेत. पुरुषांमधील कॅन्सरचे कारण मुख्यतः ‘तंबाखूचा वापर’ आहे. जसे तोंडाचा, फुप्फुसाचा, घशाचा कॅन्सर. स्त्रियांच्या बाबत मात्र महत्त्वाचे कॅन्सर हे सहसा स्त्रीच्या लैंगिक अवयवांचे आहेत, जसे स्तनांचा, गर्भाशयमुखाचा (सर्वायकल), अंडाशयांचा , गर्भाशयाचा कॅन्सर. आपलं दुखणं काही काही स्त्रिया लवकर सांगत नाहीत, त्यात काही लक्षणं दिसली तरी स्त्रियांच्या मनात असलेली कॅन्सरची भीती, अज्ञान आणि लाज या गोष्टींमुळे अनेक स्त्रिया दवाखान्यात लवकर जात नाहीत आणि हे सारे त्यांच्या मृत्यूच्या शक्यता वाढवतात. अनेकींना अज्ञानामुळे कॅन्सरच्या लक्षणांची माहिती नसते.
तसेच अज्ञान व गैरसमजामुळे ना HPV ची लस घेतली जाते, ना उपलब्ध स्क्रीनिंग टेस्ट केल्या जातात. लक्षणांची माहिती असली तरी लाजेमुळे होणाऱ्या त्रासाबाबत ना घरच्यांना काही सांगितले जाते, ना डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो, ना तपासण्या केल्या जातात. आणि हे सारे करूनही कॅन्सरचे निदान झालेच तर उपचारांच्या किंवा खर्चाच्या भीतीमुळे उपचारांची सुरुवात उशिरा होते. आणि कॅन्सरमध्ये वेळेला खूप महत्त्व असते.
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारतीय स्त्रिया स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे जाणवल्यानंतर त्याबाबत डॉक्टरांकडे पोहोचण्यासाठी तीन महिने उशीर करतात. आणि प्रति १ महिना उशीर झाल्यास मृत्यूचा धोका १०% वाढतो, असेही आढळून आले आहे.
स्त्रियांमधील कॅन्सर मृत्यू कमी करण्यासाठी काय करावे लागेल?
१. स्त्रियांना होणाऱ्या प्रत्येक कॅन्सरची सर्व लक्षणे स्त्रियांना माहितीच हवी. जेणेकरून लक्षणांची सुरुवात झाली की लगेच मदत मिळवता येईल. उदा. स्तनामधील गाठ किंवा स्तनांची त्वचा बदलणे, पाळी थांबल्यानंतर अंगावरून रक्त जाणे, वेदनादायक संभोग, वजन अचानक कमी होणे इ.
२. बऱ्याचदा ही लक्षणे वेदनाविरहित असतात, त्यामुळे लवकर निदानासाठी वेळोवेळी स्क्रीनिंग टेस्ट करणे आवश्यक असते. जसे - स्तनांची स्वहस्त तपासणी, VIA किंवा pap smear तपासणी इ. NP-NCD या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत विविध कॅन्सरचे स्क्रीनिंग मोफत केले जाते.
३. कोणत्याही कर्करोगाची शंका आली की मनामध्ये भीती न बाळगता लवकर निदान व्हावे, यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. आधुनिक उपचार पद्धतीमधील औषधे जरी स्ट्राँग वाटली तरी देखील त्यामुळे कॅन्सरमुक्त आयुष्य मिळण्याची शक्यता वाढते.
४. कॅन्सर रुग्णाला कुटुंबीयांची साथ आवश्यक असते. लवकर निदान व लवकर उपचार जीवरक्षक ठरू शकतात. कॅन्सरकडे सकारात्मक रीतीने बघितले तर कॅन्सर उपचारानंतरदेखील आयुष्य चांगल्या प्रकारे घालवता येते. नव्यानं मोठी झेप घेता येते. त्यामुळे कॅन्सर झाल्याचे दुःख मागे टाकून लवकर उपचार सुरू करणे महत्त्वाचे असते.
५. स्त्रियांमधील कॅन्सर टाळण्यासाठी जे प्रतिबंधात्मक उपाय करता येतात, जसे HPV लसीकरण, जास्तीत जास्त काळ स्तनपान, वजन नियंत्रणात ठेवणे, आरोग्यपूर्ण जीवनशैली. हे सारं करण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन द्यायला हवे.
६. जगभरातील स्त्रियांपेक्षा भारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सर मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. भारतात दर सात मिनिटांत एका स्त्रीचा मृत्यू सर्वायकल अर्थात गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे होतो. लवकर निदान आणि लवकर उपचारामुळे टाळता येऊ शकणारे हे मृत्यू वेदनादायी आहेत. या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त स्त्रियांमधील कॅन्सरमृत्यू टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊया.
