Diabetes : चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे हल्ली तरूणांनाही डायबिटीस, थायरॉईड आणि हृदयविकार यांचा धोका वाढताना दिसत आहे. ताणतणाव आणि कामाचा वाढता ताण यामुळे हृदयासोबतच मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. दरवर्षी हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे, ज्यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. यासाठी भारत सरकार सातत्याने जनजागृती मोहिमा राबवत असते. मात्र आयुर्वेदानुसार अनेक आजारांवरील उपाय आपल्या स्वयंपाकघरातच दडलेले आहेत.
आयुर्वेदानुसार हृदयविकाराचे खरे कारण
आयुर्वेदात हृदयाशी संबंधित आजारांचे मुख्य कारण ताणतणाव आणि शरीरात विषारी घटक मानला जातो. चुकीचा आहार, पॅक्ड फूड, जास्त गोड पदार्थ, सततचा ताण आणि झोप यामुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. मात्र घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांमुळे हृदयाचे आरोग्य जपता येते. यामध्ये डाळी आणि कडधान्यांचं सेवन फार फायदेशीर मानलं जातं. भारतीय जेवणात डाळींचं महत्त्वाचं स्थान असून त्यांचे नियमित सेवन कोरोनरी आर्टरी डिजीजचा धोका कमी करू शकते.
डाळी आणि कडधान्ये कोलेस्टेरॉल कसे कमी करतात?
डाळी आणि कडधान्यांमध्ये डायटरी फायबर मोठ्या प्रमाणात असतं, जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. शरीरात नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल तयार होत असतं; पण आहारातून जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल गेल्यास ते रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण करते. त्यामुळे हृदयावर दबाव येतो, रक्त पंप करण्यास अडचण होते आणि अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास व हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड दिसून येतो.
मधुमेह, बीपी आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी कोणत्या डाळी उपयुक्त?
डाळी आणि कडधान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो आणि रक्तदाबही संतुलित ठेवण्यास मदत होते. हृदयविकार असलेल्या किंवा त्यापासून बचाव करू इच्छिणाऱ्यांसाठी चवळी, मसूर, राजमा, मूग, चणे आणि मोठ या डाळी विशेष फायदेशीर ठरतात. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आहारात सलाड, सूप, डाळी, हिरव्या पालेभाज्या आणि ब्राउन राईस यांचा समावेश नक्की करा. ब्राउन राईसमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कॅन्सरविरोधी गुणधर्म असल्यामुळे ते शरीराला अनेक प्रकारे लाभदायक ठरते.
