Join us

उन्हाळ्यात सोडिअम कमी झालं तर वाढतो हृदयरोगाचा धोका, 'ही' लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध!

By अमित इंगोले | Updated: May 8, 2025 13:52 IST

Sodium Deficiency Effects : सोडिअम शरीरातील पाण्यात आणि फ्लूइडमध्ये बॅलन्स ठेवतं. त्यामुळे जर शरीरात सोडिअम कमी झालं तर अचानक चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही बेशुद्ध पडू शकता.

Sodium Deficiency Effects : जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी किती नुकसान असतं हे याबाबतचे रिपोर्ट्स नेहमीच समोर येत असतात. जास्त मीठ आरोग्यासाठी नुकसानकारक असलं तरी योग्य प्रमाणात मीठ शरीरासाठी तेवढंच महत्वाचं असतं. इतकंच नाही तर उन्हाळ्यात जर शरीरात सोडिअम (Sodium Deficiency) कमी झालं तर यानं हार्ट अ‍ॅटॅकचा धोकाही वाढतो. सोडिअम आपल्या शरीरासाठी इलेक्ट्रोलाइट्स आहे जे मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमसोबत मिळून शरीरातील इलेक्ट्रिक सिग्नल तयार करतं. इतकंच नाही तर सोडिअम शरीरातील पाण्यात आणि फ्लूइडमध्ये बॅलन्स ठेवतं. त्यामुळे जर शरीरात सोडिअम कमी झालं तर अचानक चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही बेशुद्ध पडू शकता. सोडिअम कमी झाल्यावर कमजोरी आणि थकवा इतका वाढतो की, तुमचं चालणंही अवघड होतं.

सोडिअम कसं कमी होतं?

सामान्यपणे उन्हाळ्यात लोक जास्त पाणी पितात. मायो क्लीनिकनुसार जर तुम्ही खूप जास्त पाणी पित असाल तर शरीरातील सोडिअम लघवी आणि घामाच्या माध्यामातून निघून जातं. तसंही सोडिअम उन्हाळ्यात शरीरातून निघून जातं. तसेच इतरही अशी कारणं आहेत ज्याद्वारेही सोडिअम कमी होतं. लघवीसंबंधी आजाराची औषधं, हृदयरोग, लिव्हरसंबंधी आजार, उलटी, डायरिया, हार्मोनमध्ये बदल या कारणांमुळेही सोडिअम शरीरातून कमी होतं.

सोडिअम कमी झालं कसं कळतं?

शरीरात जर सोडिअम कमी झालं असेल तर उलटी आणि मळमळ होऊ शकते. तसेच डोकंदुखी आणि चक्कर अशा समस्या सुद्धा वाढतात. मेंदुमध्ये कन्फ्यूजन जास्त होतं. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. स्नायूंमधील शक्ती फार कमी होते. गंभीर स्थितीत तुम्ही बेशुद्धही पडता.

किती असावं सोडिअम?

सोडिअमचं प्रमाण रक्ताच्या टेस्टद्वारे मोजता येतं. एका हेल्दी व्यक्तीच्या रक्तात सोडिअमचं प्रमाण 135 ते 145 mEq / L दरम्यान असायला हवं. जर यापेक्षा जास्त असेल तर हृदयासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर यापेक्षा कमी असेल तर मेंदुच्या कोशिका कमजोर होतात ज्यामुळे मेंदुसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा धोका वाढतो.

सोडिअम कसं मिळवाल?

डब्ल्यूएचओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार एका वयस्क व्यक्तीला रोज 5 ग्रॅम मिठाची गरज असते. ज्यात 2 ग्रॅम सोडिअम असायला हवं. यापेक्षा जास्त खाल तरी समस्या आणि यापेक्षा कमी खाल तरीही समस्या. जास्त मीठ खाल तर हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढते. कमी खाल तर मेंदुचं नर्वस सिस्टिम बिघडू शकतं.

सोडिअमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त गोष्टी करण्याची गरज पडत नाही. फक्त फार जास्त पाणी पिऊ नये आणि खूप कमी मिठही खाऊ नये. चवीला पुरेसं मीठ खा आणि तहान लागेल तेवढंच पाणी प्या.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स