Join us

National Nutrition Week 2025 special: डाळी खाण्याचे वेगवेगळे फायदे- पाहा कोणती डाळ कोणासाठी चांगली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2025 11:29 IST

National Nutrition Week 2025 special: लेख ५: जेवणाच्या पानातून दिवसेंदिवस डाळींचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे वेगवेगळी दुखणी डोकं वर काढायला लागली आहेत..

ठळक मुद्दे मिक्स डाळींचे डोसे, मिक्स डाळीची खिचडी किंवा वरण रोजच्या ताटात असल्याने प्रोटीन्सची कमतरता भरून निघते व कित्येक आजारांपासून आपले संरक्षण होते.

डाळ हा भारतीय आहार पद्धतीधला एक अतिशय महत्त्वाचा घटक. वरण किंवा आमटी या स्वरुपात तर डाळ आपण खातोच. पण आपल्याकडे शेपू, भोपळा, पत्ताकोबी अशा वेगवेगळ्या भाज्यांमध्येही भिजवलेल्या डाळी घालण्याची पद्धत आहे. शाकाहारी लोकांसाठी तर वेगवेगळ्या डाळी हा शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून काढणारा सगळ्यात महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत मानला जातो. पण आजकाल रोज जेवणाच्या ताटात असणारी डाळ  कमी झालेली दिसते आहे. त्यामुळे अनेक दुखणीही वाढायला लागली आहेत.(benefits of eating different types of dal or lentils)

 

मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, मटकी, हरभरा, राजमा असे डाळींचे अनेक प्रकार आपल्या भारतामध्ये सहज उपलब्ध असतात. त्यापैकी मुगाची डाळ पचायला हलकी व आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. मसूर डाळ रक्त वाढवते. तूर डाळही अतिशय पौष्टिक असते. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकातही ती मुख्यत: वापरली जाते. चणा डाळ हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते तर उडीद डाळ भरपूर ताकद देते. मटकी, हरभरा, मूग यांना मोड आणून सलाड स्वरूपात रोजच्या नाश्त्यामध्ये घेतल्यास उत्तम फायबर व प्रोटीन्स मिळतात. तसेच ते नियमितपणे खाल्ल्यास वजन नियंत्रित राहाते. दिवसभर पुरेल एवढी एनर्जी त्यातून मिळते. 

 

हरभरा व तूर डाळ थोड्या वातूळ असतात. त्यामुळे जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी होऊ शकते. त्यामुळे तूर आणि मूग असे मिक्स वरण कधीही चांगले. आठवड्यातून एकदा तरी मसूर किंवा मसुराची डाळ खावी. वरण- भात, वरण- पोळी खाण्यापेक्षा कधीकधी संध्याकाळच्या जेवणात एक बाऊल वरण प्यावे. त्यामुळे वजन नियंत्रणात राहून पोटालाही आणि पोटाच्या आतड्यांनाही आराम मिळतो. मिक्स डाळींचे डोसे, मिक्स डाळीची खिचडी किंवा वरण रोजच्या ताटात असल्याने प्रोटीन्सची कमतरता भरून निघते व कित्येक आजारांपासून आपले संरक्षण होते. प्रतिकारशक्तीही वाढते. डाळ जास्त व तांदूळ अगदी कमी घेऊन केलेली मऊ खिचडी खाल्ल्याने वजन कमी होते व पोटही भरल्यासारखे राहते. म्हणूनच डाळींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की- "थाळीत डाळ रोज असावी, पोषणाचा साठा तीच खरी... रक्त वाढे ताकद वाढे, आरोग्याची देते हमी खरी".

शितल मोगल (आहारतज्ज्ञ आणि वर्कआउट प्लॅनर) 8305243532

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न