ऑगस्ट महिना 'हेअरलॉस अवेअरनेस मंथ' म्हणून साजरा केला जातो आणि हा उपक्रम प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे कारण केस गळणे ही समस्या आजच्या काळात जवळजवळ प्रत्येकालाच भेडसावत आहे. (Hair Loss Awareness Month: Hair loss is not just your problem, millions are suffering, see the reasons..)पूर्वी वय वाढल्यावर केस गळायचे किंवा इतर काही ठराविक कारणांमुळे केस गळायचे. पण आता तरुण पिढीतही ही समस्या प्रचंड प्रमाणात दिसून येते. यामागे सर्वात मोठा घटक म्हणजे बदलती जीवनशैली. अनियमित झोप, ताणतणाव, फास्टफूड आणि जंकफूड खाण्याचे वाढते प्रमाण. पाण्याचे अपुरे प्रमाण आणि व्यायामाकडे दुर्लक्ष या सगळ्यामुळे शरीरातील पोषणतत्त्वांचा समतोल बिघडतो. केसांना लागणारी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, परिणामी केस कमकुवत होतात आणि गळू लागतात. मात्र फक्त हेच कारण नाही.
याशिवाय वातावरणाचाही मोठा प्रभाव दिसतो. शहरांमधील प्रदूषण, धूळ, धूर आणि रासायनिक घटकांनी भरलेले पाणी हे केसांच्या मुळांवर थेट परिणाम करतात. यामुळे केस कोरडे होतात आणि त्यांचे आरोग्य खालावते. हवामानातील बदल, जास्त उष्णता किंवा आर्द्रता यामुळेही केसांमध्ये नैसर्गिक ओलावा टिकत नाही आणि गळती वाढते. त्यात आजकाल मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे स्प्रे, जेल, डाय किंवा वारंवार होणारे हेअर ट्रीटमेंट्सही केसांच्या नैसर्गिक रचनेला हानी पोहोचवतात.
मानसिक आरोग्याचा केसांवर फार परिणाम होतोच. सततचा ताण, चिंता, कामाचा दबाव किंवा भावनिक अस्थिरता हे हार्मोनल बदल यांचा थेट परिणाम टाळूवर होतो. हेअरलॉस अवेअरनेस मंथ आपल्याला या सगळ्या घटकांची आठवण करून देतो की केस गळणे ही केवळ बाह्य समस्या नसून शरीर आणि मनाच्या एकूण आरोग्याशी संबंधित बाब आहे. केस निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, तणावावर नियंत्रण आणि नैसर्गिक पद्धतींचा वापर हे सर्व तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना हा केवळ केस गळतीविषयी जागरुकता निर्माण करणारा नसून जीवनशैली बदलण्याची आणि आपल्या आरोग्याकडे नव्याने पाहण्याची आठवण करुन देण्यासाठी साजरा केला जातो.