Join us

श्रीखंड पुरीचं हेवी जेवण करून होतंय पाणी- पाणी? ३ सोपे उपाय... चटकन पडेल आराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 11:05 IST

Remedies after having heavy food: गोडधोडाचं, तेलकट- तुपकट अगदी पोटभर खाल्लं.. आणि आता मात्र त्या हेवी जेवणाचा त्रास होत असेल तर या ३ पैकी एखादा उपाय करायला विसरू नका... 

ठळक मुद्दे सणासुदीच्या हेवी जेवणाने जडपणा आला असेल आणि पाणी- पाणी होत असेल तर करून बघा हे ३ सोपे उपाय...

परंपरागत पुजन करून गुढी उभारली की मग साग्रसंगीत केल्या जाणाऱ्या जेवणावर यथेच्छ ताव मारला जातो.. श्रीखंडाची गोडी... गरमागरम पुऱ्या, त्यांच्या जोडीला एखादी मसाल्याची भाजी, वरण- भात, चटणी, काेशिंबीर, कढईतून थेट ताटात आलेले गरमागरम भजे.. असे सजलेले आणि वेगवेगळ्या चवींनी नटलेले ताट समोर पाहून मग आपलाही ताबा सुटतो आणि प्रत्येक पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो... (remedies after taking heavy food)

 

एवढं हेवी जेवण झालं की त्यानंतर मग काही वेळाने मात्र पोटात चांगलाच धुमाकुळ सुरू होतो. धड झोपही येत नाही आणि धड बसवतही नाही.. बरं एवढं जेवण झालेलं असतं की चालण्या - फिरण्याचाही जाम ंकंटाळा येत असतो. शिवाय पुऱ्या, भजी असे तळलेले पदार्थ आणि त्याच्या जोडीला श्रीखंडाचा गोडवा.. यामुळे मग चांगलंच पाणी- पाणी होऊ लागतं.. असा सगळा त्रास कमी कसा करायचा, हेच मग कळत नाही.. तुम्हालाही सणासुदीच्या हेवी जेवणाने असाच जडपणा आला असेल आणि पाणी- पाणी होत असेल तर करून बघा हे ३ सोपे उपाय...

 

१. वज्रासनात बसा.. जेवण पचविण्यासाठी हा सगळ्यात उत्तम उपाय.. पोटातली अस्वस्थता वाढली असेल तर चटकन हा उपाय करा. वज्रासन घाला आणि काही मिनिटे त्याच अवस्थेत बसून रहा.. वज्रासन घालणे शक्य नसेल तर उशी किंवा लोडची मदत घ्या. वज्रासनाची अवस्था करा. पायावर उशी किंवा लोड ठेवा आणि त्यावर बसा. काही मिनिटे हे आसन केल्याने पोटातली खळवळ नक्कीच कमी होईल..

 

२. लिंबू पाणी आणि सोडा घ्या.. अतिजेवणाचा त्रास होत असल्यास हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी लिंबू सरबत करा. सरबत करताना साखर खूप टाकू नका. अगदी मर्यादित असू द्या. कारण जास्त साखरेमुळे पुन्हा जडपणा वाढेल. लिंबू सरबतात थोडा सोडा किंवा इनो टाका आणि हे सरबत प्या. 

 

३. काकडी खा... तेलकट- तुपकट, गोडधोड जेवणामुळे जर खूप पाणीपाणी होत असेल तर काकडी खाण्याचा उपाय उत्तम आहे. काकडीमध्ये ८० टक्के पाणी असतं. शिवाय काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो आणि अतिजेवणामुळे होणारी तगमग कमी होते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न