आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थ असे असतात जे शरीराला उष्णता देतात. हे पदार्थ मर्यादेत घेतले तर उपयोगी ठरतात, पण प्रमाणाबाहेर किंवा चुकीच्या वेळी घेतल्यास शरीरातील उष्णता वाढते, पित्ताचा त्रास होतो, तोंडाला फोड येणे, अॅसिडिटी, जळजळ, डोकेदुखी अशा तक्रारी वाढायला लागतात. (Do you like to eat these 4 foods? This is why bile and heat increase, the right way to eat is important)विशेषतः ज्यांना पित्तप्रकृती आहे, त्यांनी या पदार्थांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
पपई हा असा एक पदार्थ आहे जो शरीरातील उष्णता वाढवतो. पपई पचनासाठी चांगली असली तरी ती जास्त प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी खाल्ली, तर पित्त वाढू शकते. पपई त्वचेसाठी फार फायद्याची असते. मात्र पपई पाळीच्या वेळा पुढे मागे करु शकते एवढी उष्ण मानली जाते. त्यामुळे पपई खाण्याची वेळ आणि प्रमाण योग्य असावे. तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी शक्यतो जास्त पपई खाणे टाळायलाच हवे.
शेंगदाणे हे उष्ण गुणधर्माचे असून शरीराला ताकद देतात. मात्र रोज जास्त प्रमाणात किंवा भाजून खाल्ल्यास पित्ताचा त्रास वाढू शकतो. शेंगदाणे कच्चे किंवा थोडे भिजवून खाल्ले, तर ते पचायला हलके पडतात. तसेच शेंगदाणे किंवा खारे दाणे त्याचे टोक काढून खावेत. त्या भागात पित्त वाढवणारे घटक जास्त असतात असे मानले जाते. त्यामुळे शेंगदाणे खाताना जिभेवर ताबा महत्त्वाचा.
आल्याचा वापर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर केला जातो. आले पचन सुधारते, पण आलं ही उष्णच. उष्ण असल्यामुळे जास्त आले खाल्ल्यास छातीत जळजळ, घसा कोरडा पडणे किंवा पित्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आले नेहमी शिजवून किंवा उकडून घ्यावे. कच्चे आले जास्त प्रमाणात खाणे टाळावे आणि आल्यासोबत गूळ, मध किंवा ताक घेतल्यास त्याचा दाहक परिणाम कमी होतो. खरे तर आले उष्ण असले तरी पित्तावर बाधत नाही. त्यामुळे आल्याचा रस किंवा किसलेले आले खाताना त्यात थोडे मीठ घातले जाते. जेणेकरुन ते बाधणार नाही.
तिखट मिरचीही शरीरातील उष्णता वाढवणारा पदार्थ आहे. मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्यास अॅसिडिटी, पोटात जळजळ आणि तोंडाला फोड येण्याचा त्रास होऊ शकतो. मिरची शक्यतो कमी प्रमाणात, शिजवलेल्या स्वरुपात घ्यावी. दही, ताक किंवा भाजीमध्ये मिसळून घेतल्यास तिचा उष्ण प्रभाव संतुलित राहतो. कच्ची मिरची खाण्याची सवय फार वाईट. त्यामुळे न कळत घसा आणि पोट खराब होते.
एकूणच, पपई, शेंगदाणे, आले आणि मिरची हे चार पदार्थ शरीरातील उष्णता वाढवू शकतात. मात्र योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पदार्थांसोबत घेतले, तर ते आरोग्यास बाधक ठरत नाहीत. शरीराची प्रकृती ओळखून आणि आहारात संतुलन ठेवले, तर पित्ताचा त्रास टाळताही येतो आणि आरोग्यही चांगले राहते.
