आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्याच अंगणात एक सुंदर असे हिरवेगार तुळशीचे रोपं असतेच. अंगणातील तुळस कायम हिरवीगार आणि बहरुन यावी यासाठी आपण नेहमीच रोपाला पाणी घालतो, सोबतच योग्य प्रकारे काळजीही घेतो. परंतु अनेकदा योग्य काळजी घेऊनही तुळशीचे रोप सुकू लागते. कित्येकदा आपण तुळशीच्या रोपाची योग्य ती काळजी घेऊनही अचानक पानं पिवळी पडणे, रोप कोमेजणे किंवा हळूहळू सुकू लागणे अशा अनेक समस्या वरचेवर दिसू लागतात. योग्य काळजी घेत असूनही तुळस तग धरत नाही, तेव्हा नेमकं काय करावं हे समजत नाही. अशावेळी घरात सहज उपलब्ध असलेला एक साधा पदार्थ म्हणजे मीठ... तुळशीच्या रोपासाठी मीठ फायदेशीर ठरू शकते, हे फार कमी लोकांना माहिती असतं. मिठाचा योग्य आणि मर्यादित वापर केल्यास काही समस्या कमी होऊन रोपाला पुन्हा तजेला मिळू शकतो. मात्र चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास रोपाचं नुकसानही होऊ शकतं(how to save drying tulsi plant).
रोप सुकण्यामागे मातीतील पोषक तत्वांची कमतरता हे मुख्य कारण असू शकतं. अशावेळी 'एप्सम सॉल्ट' (मॅग्नेशियम सल्फेट) हे एखाद्या संजीवनीप्रमाणे काम करतं. साध्या मिठाचा वापर झाडासाठी घातक ठरू शकतो, पण हे विशेष मीठ तुमच्या सुकलेल्या तुळशीच्या रोपाला पुन्हा हिरवेगार करण्यासाठी कसं मदत करतं, तसेच तुळशीचं सुकलेलं रोप पुन्हा हिरवंगार ( salt remedy for tulsi plant care) करण्यासाठी मिठाचा नेमका कसा आणि किती वापर करावा ते पाहूयात...
एप्सम सॉल्ट म्हणजे नेमकं काय ?
बऱ्याचदा लोक याला साधे खाण्याचे मीठ समजण्याची चूक करतात, पण हे त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. एप्सम सॉल्टचे वैज्ञानिक नाव मॅग्नेशियम सल्फेट असे आहे. यामध्ये असलेले मॅग्नेशियम रोपाला क्लोरोफिल (Chlorophyll) तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे पानांचा रंग गडद हिरवा होतो. तर दुसरीकडे, सल्फेट रोपाला आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्याची शक्ती देते. एक गोष्ट लक्षात ठेवा, येथे साध्या मिठाचा वापर अजिबात करू नका, कारण ते रोपाला जाळू शकते.
प्रमाण चुकलं की इडली डोसे फसलेच, डाळ तांदळांचं ‘असं’ गणित परफेक्ट- अजिबात विसरु नका प्रमाण...
अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर...
योग्य प्रमाण आणि मिश्रण तयार करणे :- तुळशीच्या रोपासाठी एप्सम सॉल्टचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. १ लिटर स्वच्छ पाण्यात केवळ १ छोटा चमचा एप्सम सॉल्ट टाकावे. हे मीठ जोपर्यंत पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही, तोपर्यंत ते नीट ढवळून घ्यावे. हे मिश्रण एका शक्तिशाली 'प्लांट टॉनिक' प्रमाणे काम करते, जे थेट मुळांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक पोषण देते.
वापरण्याची योग्य पद्धत :- तयार केलेले द्रावण थेट तुळशीच्या कुंडीतील मातीत घाला. द्रावण घालताना हे लक्षात ठेवा की माती अगदीच कोरडी नसावी; मातीत थोडा ओलावा (Moisture) असणे अधिक फायदेशीर ठरते. याशिवाय, तुम्ही हे द्रावण एका स्प्रे बाटलीत भरून पानांवर देखील फवारू शकता. यामुळे रोप आपल्या पानांवरील छिद्रांवाटे थेट मॅग्नेशियम शोषून घेते आणि त्याचे परिणाम लवकर दिसू लागतात.
मातीची मशागत करणे आहे आवश्यक :- मिठाचे पाणी टाकण्यापूर्वी कुंडीतील माती एखाद्या छोट्या खुरप्याने किंवा अवजाराने हलकी-हलकी उकरून घ्या. माती खाली - वर केल्यामुळे त्यामध्ये हवा आणि ऑक्सिजन चांगल्या प्रकारे खेळता राहतो. असे केल्यानंतर जेव्हा तुम्ही एप्सम सॉल्टचे पाणी टाकता, तेव्हा ते थेट मुळांच्या खोलीपर्यंत पोहोचते. यामुळे माती मऊ होते आणि सुकलेले रोप पुन्हा वाढू लागते.
रोपाच्या मातीत केवळ मीठ टाकणेच पुरेसे नाही, तर तुळस नक्की का सुकत आहे याचे कारण शोधणे देखील महत्त्वाचे आहे. जर रोपावर खूप जास्त मंजिरी आली असेल, तर ती लगेचच काढून टाका. कारण मंजिरी रोपाची सर्व ऊर्जा शोषून घेते, ज्यामुळे झाडाची वाढ थांबते. त्याचबरोबर, बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपण मातीमध्ये थोडी कडुलिंबाची पावडर किंवा हळद देखील मिसळू शकता. यामुळे मुळांना कीड लागत नाही आणि रोप सुरक्षित राहते.
ऊन आणि पाण्याची योग्य काळजी :- एप्सम सॉल्टचा उपाय केल्यानंतर, तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला सकाळचे ४ ते ५ तास कोवळे ऊन मिळेल. दुपारच्या कडक उन्हापासून रोपाचा बचाव करा. कुंडीतील मातीचा वरचा थर सुकलेला जाणवला, तरच पाणी द्या. अति पाण्यामुळे मुळे सडू शकतात, त्यामुळे पाणी आणि ऊन यांचा योग्य समतोल राखल्यास एप्सम सॉल्टचा फायदा चांगला आणि दुप्पट वेगाने दिसून येईल.
