Join us

कोणत्या आजारात कोणतं ज्यूस ठरतं फायदशीर? भूक न लागणे, अशक्तपणा ते कावीळ-पाहा गुणकारी ज्यूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:10 IST

Which juice works for which disease : कोणत्या आजारात कोणत्या फळांचा ज्यूस फायदेशीर ठरतो हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

Which juice works for which disease : तापमान वाढायला सुरूवात झाली की, भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. बरेच लोक शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचे ज्यूसही पितात. सामान्यपणे कुणी आजारी असल्यावरही फळांचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, कोणत्या आजारात कोणत्या फळांचा ज्यूस फायदेशीर ठरतो हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

भूक कमी लागत असेल तर...

काही आजारामुळे काही लोकांची भूक खूप कमी होते. त्यांना अन्न जात नाही. अशात रोज सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. त्याशिवाय आल्याच्या पाण्यात सैंधव मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढण्यास मदत मिळते. तसेच लिंबू, गाजर, बीट, पालक, तुळशी, कडूलिंब, बेलाची पानं आणि कोबीचा रस प्यायल्यानं रक्त शुद्ध होतं. ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. 

काविळ असेल तर...

काविळची समस्या झाली असेल तर द्राक्ष, सफरचंद आणि मोसंबीचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. अॅसिडिटीची समस्या झाली असेल तर गाजर, पालक, तुळशी, द्राक्ष आणि मोसंबीच्या ज्यूस फायदेशीर ठरतो. अल्सरच्या रूग्णांनी गाजर, कोबी आणि द्राक्षाचा ज्यूस प्यावा. 

चमकदार त्वचेसाठी...

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी नारळाचं पाणी खूप फायदेशीर ठरतं. नारळाच्या पाण्यात अनेक पोषक तत्व, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे त्वचेवर ग्लो आणतात आणि त्वचा आतून साफ करतात. त्याशिवाय पिंपल्सचे डाग दूर करण्यासाठी गाजर, कलिंगड, कांदा, तुळशीचा रस प्यावा. 

कॅन्सर असेल तर...

कॅन्सरच्या रूग्णांना गाजर आणि द्राक्षाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी कारलं, कोबी, पालक, खोबरं आणि गाजराचा ज्यूस चांगला असतो. किडनी स्टोन असेल तर काकडी रस फायदेशीर ठरतो. 

सर्दी-कफ असेल तर...

सर्दी किंवा कफ झाला असेल तर मूळा, आलं, लसूण, तुळशी आणि गाजराचा रस प्यावा. वजन वाढवण्यासाठी पालक, गाजर, बीट, कोबीचा रस प्यावा. तर वजन कमी करण्यासाठी अननस, कलिंगड, दुधी भोपळ्याचा ज्यूस आणि लिंबू पाणी प्यावं. 

रक्त कमी असेल तर...

शरीरात जर रक्त कमी झालं असेल तर मोसंबी, द्राक्ष, पालक, टोमॅटो, बीट आणि सफरचंद यांचा ज्यूस प्यावा. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी द्राक्ष, अननस आणि रसभरीचा रस प्यावा. डोकेदुखी दूर करायची असेल तर काकडी, बीट, गाजराचा रस प्यावा. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स