राखीपौर्णिमेचा सण म्हटला की जेवणात नारळीभात हवाच.. एरवी आपण वर्षभर तो करत नाही. पण राखीपौर्णिमेच्या दिवशी मात्र हौशीने नारळीभात करण्याचा बेत आखला जातो. आता एखादा पदार्थ कधीतरीच करायचा म्हटलं तर बऱ्याचदा तो करताना काहीतरी लहानशी चूक होते आणि आपला मेन्यू पुर्णपणे फसून जातो. नारळीभात करताना अनेकींना हा अनुभव येतोच. कधी तांदूळ कच्चा राहातो तर कधी तो जरा जास्तच शिजून गचका होऊन जातो (how to make narali bhat?). म्हणूनच नारळीभात करताना तांदूळ कसा शिजवायचा, त्यादरम्यान नेमकी काय काळजी घ्यायची याच्या टिप्स तर पाहूच, पण नारळीभात करण्याची परफेक्ट रेसिपीही जाणून घेऊ.(keshari bhat recipe for Raksha bandhan festival)
नारळीभात करण्याची रेसिपी
साहित्य
एक ते दिड वाटी तांदूळ
२ ते ३ लवंगा आणि वेलची
२ ते ३ टेबलस्पून काजू आणि मनुका
दालचिनीचा छोटासा तुकडा
केशराच्या ७ ते ८ काड्या
१ ते दिड वाटी साखर
अर्धी वाटी खोवलेला नारळ
४ ते ५ चमचे तूप.
१ टीस्पून खाण्याचा केशरी रंग
रेसिपी
नारळी भातासाठी बासमती तांदूळ वापरावा. तांदूळ शिजवण्यापुर्वी तो स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावा. त्यानंतर १ वाटी तांदूळ असेल तर दिड वाटी पाणी घ्यावे आणि त्यात भात शिजायला ठेवावा. कुकरमध्ये शिजवू नका. भात शिजवताना पाण्यात थोडं तेल, मीठ आणि लिंबाचा रसही घाला. यामुळे भात गचका होत नाही. छान मोकळा शिजतो. तांदूळ शिजत असताना अधूनमधून हलवत राहा. तसेच तांदूळ शिजून झाल्यानंतर तो चाळणीमध्ये काढून घ्या आणि त्यावर थंड पाण्याचा शिबका मारा. यामुळे भात मोकळा होतो. भात पुर्णपणे १०० टक्के शिजवू नका. कारण नंतर तो वाफवून घ्यावा लागतो. त्यामुळे साधारण ८० ते ९० टक्के एवढा भात शिजत आला की गॅस बंद करा.
भात शिजवून झाल्यानंतर कढईमध्ये तूप घालून त्यात लवंग, वेलची, दालचिनी परतून घ्या. त्यानंतर त्या कढईमध्येच थोडा खाण्याचा केशरी रंग घाला. त्यानंतर त्यात नारळ घालून परतून घ्या आणि सगळ्यात शेवटी साखर घालून तिचा पाक होऊ द्या. आता या पाकामध्ये शिजवलेला भात. तुपात तळून घेतलेले काजू, मनुका, केशराच्या काड्या असं सगळं घाला आणि सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्या. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. छान गरमागरम, सुगंधी नारळीभात तयार.