Best Dal For Monsoon: वातावरणात बदल झाला की, आपल्याला आहारात देखील बदल करावा लागतो. खासकरून पावसाळ्यात आहाराची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते. कारण या दिवसांमध्ये पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. पचनशक्ती कमजोर झाल्यानं पोटासंबंधी समस्या होतात. आयुर्वेदानुसार, या दिवसांमध्ये वात आणि कफ असंतुलित होतो. ज्यामुळे पोटात गॅस, अपचन आणि जडपणा यांसारख्या समस्या होतात. अशात आपण काय खातोय याची काळजी घेतली पाहिजे. खासकरून डाळींच्या निवडीबाबत. पावसाळ्यात कोणत्या डाळी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याबाबत एक्सपर्टनी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. फेमस आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
कोणत्या डाळी खाव्यात?
मूग डाळ
श्वेता शाह यांनी सांगितलं की, पिवळी मूग डाळ सगळ्यात हलकी आणि लवकर पचन होणारी डाळ आहे. या डाळीनं पचन तंत्रावर जास्त दबाव पडत नाही. अशात जर तुम्हाला पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या राहत असेल तर ही डाळ बेस्ट पर्याय ठरू शकते.
मसूर डाळ
मसूरची डाळ थोडी उष्ण असते. पण ही डाळ पोटासाठी चांगली असते. पावसाळ्यात तुम्ही मसूर डाळ खाऊ शकता. ही डाळ लवकर शिजते आणि सहजपणे पचन होते.
तूर डाळ
तूर डाळ थोडी पचायला जड असते. पण जर यात राई, जिरे, हींग आणि थोडं तूप टाकून शिजवली तर पचन लवकर होण्यास मदत होईल. तसेच तूर डाळीचं पाणी सुद्धा पौष्टिक असतं.
कोणत्या डाळी टाळाव्यात?
राजमा
राजमाची टेस्ट भरपूर लोकांना आवडते. पण राजमा पचायला जड असतो. पावसाळ्यात यामुळे पोटात गॅस आणि जडपणा जाणवू शकतो. त्यामुळे या दिवसात राजमा खाणं टाळलं पाहिजे.
चणा डाळ
श्वेता शाह सांगतात की, चणा डाळीनं कफ वाढण्याचा धोका अधिक असतो आणि या दिवसांमध्ये अपचन व सूजची समस्या वाढवू शकते. त्यामुळे ही डाळ या दिवसात टाळावी.
उडीद
उडीद डाळ डाळींमध्ये पचायला सगळ्यात जड मानली जाते आणि पावसाच्या दिवसांमध्ये ही डाळ पचायला खूप वेळ लागते. ज्यामुळे गॅस, पोटात वेदना अशा समस्या होऊ शकतात.
काय काळजी घ्याल?
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, 'जेव्हा डाळ कराल तेव्हा उकडताना वर जो पांढरा फेस येईल तो काढून टाका. हा फेस अपचन आणि गॅसचं कारण बनू शकतो. सोबतच डाळींमध्ये हळद, हींग, जिरे आणि आलं यांसारखे मसालेही टाका. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होईल'.