आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात फ्रिज असतो. पण अजूनही अनेक ठिकाणी, लोडशेडींगमुळे किंवा इतर कारणांमुळे फ्रिज वापरला जात नाही. काम किंवा कॉलेजसाठी बाहेर राहणाऱ्यांकडे फ्रिज नसतो. अशा वेळी भाजी, दूध आणि इतर पदार्थ कसे टिकवायचे हा मोठा प्रश्न असतो. मात्र आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी फ्रिजशिवायच वर्षानुवर्षे हे सारं सांभाळलं आहे.(Milk will not spoil even if you don't keep it in the fridge - there's no need to heat it constantly, see this amazing trick) काही सोप्या आणि घरगुती युक्त्या वापरल्या तर दूध आणि भाजी काही काळ ताजे ठेवणे शक्य आहे.
दूध पटकन नासते, विशेषतः उष्ण हवामानात. त्यामुळे दूध आणल्यावर सर्वप्रथम ते नीट उकळून घ्यावे. उकळी आल्यावर गॅस बंद करून ते पूर्ण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर पुन्हा एकदा हलकी उकळी काढा. दूध जास्त वेळ टिकते.
फ्रिज नसताना दूध ठेवण्यासाठी एक जुनी आणि प्रभावी युक्ती म्हणजे पाणी. मोठ्या ताटलीत किंवा परातीत थंड पाणी घ्यावे आणि त्यात दुधाचे भांडे ठेवावे. पाणी भांड्याच्या अर्ध्या उंचीपर्यंत असावे. यामुळे बाहेरील उष्णता कमी प्रमाणात भांड्यापर्यंत पोहोचते आणि दूध तुलनेने थंड राहते. पाणी गरम झाले की ते बदलावे. शक्य असल्यास पाण्यात थोडेसे मीठ टाकल्यास ते जास्त वेळ थंड राहण्यास मदत होते. दुसरी पद्धत म्हणजे ओल्या कापडाचा वापर. दूधाचे भांडे स्वच्छ ओल्या कापडात गुंडाळून हवेशीर जागेत ठेवावे. कापड कोरडे झाले की पुन्हा ओले करावे. बाष्पीभवनामुळे भांडे थंड राहते आणि दूध लवकर नासत नाही.
मातीची भांडीही फार उपयोगी ठरतात. मातीच्या भांड्यात दूध किंवा ताक ठेवल्यास ते नैसर्गिकरीत्या थंड राहते. ग्रामीण भागात आजही ही पद्धत वापरली जाते. मातीच्या भांड्यातील सूक्ष्म छिद्रांमुळे बाष्पीभवन होते आणि आतील पदार्थ थंड राहतात.
भाजी टिकवण्यासाठीही काही सोपे उपाय आहेत. भाजी कधीही धुऊन ठेवू नये; धुतल्यास ती लवकर खराब होते. भाजी कोरड्या आणि हवेशीर जागेत पसरवून ठेवावी. पालेभाज्या ओल्या कापडात गुंडाळून ठेवल्यास त्या जास्त वेळ ताज्या राहतात. कांदा, बटाटा यांसारख्या भाज्या एकत्र न ठेवता वेगळ्या ठेवाव्यात, कारण त्यातून निघणाऱ्या वायूमुळे इतर भाजी लवकर खराब होते.
