उन्हाळा सुरू झाला की गारेगार ऊसाचा रस पिण्याचा मोह काही आवरत नाही. रस्त्याच्या कडेला मिळणारा ताजा, गोड आणि थंड ऊसाचा रस शरीराला क्षणात ऊर्जा देतो. पण हा रस जितका फायदेशीर आहे, तितकाच त्याचा अतिरेक टाळणेही महत्त्वाचे आहे. (Drinking a lot of sugarcane juice in summer? over consumption can effect your body )कारण जास्त प्रमाणात प्यायल्यास तो रक्तातील साखर आणि इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम करु शकतो.
ऊसाचा रस हा नैसर्गिक ऊर्जादायी पेय आहे. त्यामध्ये ग्लुकोज आणि सुक्रोजसारखे नैसर्गिक साखर घटक असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात. उन्हामुळे येणारा थकवा, अशक्तपणा कमी करण्यास तो मदत करतो. उसाच्या रसात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखी खनिजे आढळतात. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत होते. काही प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्सही त्यात असतात, जे पेशींचे होणारे नुकसान कमी करण्यास सहाय्य करतात. आम्लपित्त, लघवीच्या तक्रारी किंवा उष्माघाताच्या वेळी मर्यादित प्रमाणातील ऊसाचा रस उपयोगी ठरु शकतो.
मात्र समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा हा रस वारंवार आणि जास्त प्रमाणात घेतला जातो. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर ऊसाच्या रसात साध्या साखरेचे प्रमाण जास्त असते. हे साखर घटक रक्तात झपाट्याने शोषले जातात आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढवतात. रक्तातील ग्लुकोज वाढल्यावर स्वादुपिंड (पॅन्क्रियाज) इन्सुलिन हे हार्मोन जास्त प्रमाणात स्रवते. इन्सुलिनचे काम म्हणजे रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवणे. पण सतत उच्च प्रमाणात साखर घेतल्यास शरीरावर वारंवार इन्सुलिन स्रवतो आणि त्यामुळे ताण येतो. दीर्घकाळ असे झाल्यास पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ लागतात. या स्थितीला 'इन्सुलिन रेझिस्टन्स' म्हणतात. पुढे यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
साध्या भाषेत सांगायचे तर ऊसाचा रस खूप गोड असतो. आपण तो वारंवार पित राहिलो, तर आपल्या रक्तात साखर पटकन वाढते. ही साखर कमी करण्यासाठी शरीराला जास्त इन्सुलिन तयार करावे लागते. रोजच असे झाले, तर शरीर थकते आणि इन्सुलिनचे काम हळूहळू कमी परिणामकारक होते. त्यामुळे साखर नियंत्रणात ठेवणे कठीण जाऊ शकते.
याचा अर्थ असा नाही की ऊसाचा रस पूर्णपणे टाळावा. तो पौष्टिक आणि ताजेतवाने करणारे पेय आहे. मात्र प्रमाण महत्त्वाचे आहे. दिवसातून एक लहान ग्लास, तोही दररोज नाही तर अधूनमधून घेणे योग्य ठरते. मधुमेह, स्थूलता किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावे.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी उसाचा रस चांगला पर्याय असू शकतो, पण ‘अति तेथे माती’ हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. संतुलित प्रमाणात तो आरोग्यासाठी लाभदायक, पण अतिरेक केल्यास दीर्घकाळात तोच त्रासदायक ठरू शकतो.
