उन्हाळा सुरू झाला की शरीरातील पाण्याचे प्रमाण पटकन कमी होऊ लागते. घाम जास्त येतो, थकवा जाणवतो आणि अशक्तपणा येतो. अशा वेळी शरीराला नैसर्गिक पद्धतीने ताजेतवाने ठेवणारे आणि ऊर्जा देणारे पेय म्हणजे नारळ पाणी. थंड, हलके आणि पौष्टिक असल्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. नारळ पाण्यात अनेक महत्त्वाची खनिजे आणि पोषक घटक असतात. त्यामध्ये पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अँटी ऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. (Coconut Water in Scorching Heat: The Right Way to Drink It – Avoid Common Mistakes That Can Cause Problems)हे घटक शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून निघून गेलेले खनिजे पुन्हा मिळवण्यासाठी नारळ पाणी खूप उपयोगी ठरते.
नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला त्वरित हायड्रेशन मिळते. उन्हात बाहेर फिरताना किंवा जास्त घाम आल्यावर नारळ पाणी प्यायल्यास शरीराला लगेच ताजेपणा जाणवतो. तसेच ते पचनासाठी हलके असल्यामुळे पोटावर ताण येत नाही.
याशिवाय नारळ पाणी पचनक्रिया सुधारण्यासही मदत करते. अनेकांना उन्हाळ्यात अॅसिडिटी, अपचन किंवा जळजळ यांचा त्रास होतो. अशा वेळी नारळ पाणी प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि पचन व्यवस्थित राहण्यास मदत होते. नारळ पाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ते त्वचेसाठीही चांगले असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्यास त्वचा कोरडी पडत नाही आणि नैसर्गिक चमक टिकून राहते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही ते मदत करते.
मात्र नारळ पाणी सर्वांसाठी समान प्रमाणात योग्य असेलच असे नाही. किडनीचे काही आजार असलेले लोक, शरीरात पोटॅशियमचे प्रमाण आधीच जास्त असेल किंवा काही विशिष्ट औषधे घेत असाल तर नारळ पाणी नियमित पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींनीही प्रमाणात नारळ पाणी घ्यावे.
नारळ पाणी खूप फायदेशीर असले तरी अति सेवन टाळणे गरजेचे आहे. दिवसातून खूप वेळा किंवा खूप जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्यास शरीरात पोटॅशियमचे फार जास्त प्रमाण वाढू शकते. त्यामुळे काही वेळा पोट फुगणे, जुलाब होणे किंवा अस्वस्थता वाढते .
