- कोमल दामुद्रे
काळ बदलला की माणसाच्या गरजा आणि आवडीनिवडीही बदलतात. एकेकाळी घराघरात दिसणारी, डौलदार नऊवारी साडी नेसलेली आजी आज सहज पाहायला मिळत नाही. आज तिची साडी कपाटाच्या कोपऱ्यात किंवा सणासुदीपुरती मर्यादित झाली आहे.(Womens Day Special) काळाच्या ओघात आपल्या पेहरावातही नवनवीन बदल झाले आहेत. पण काही वस्त्रं अशी असतात, जी केवळ 'फॅशन' नसून ती संस्कृती, भावना आणि आपलेपणाची ओळख असतात.(Iconic Saree) भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील साडी ही अशीच एक अजरामर परंपरा आहे. नऊवारीपासून सहावारीपर्यंत आणि जीन्स-टीशर्टपासून ते आधुनिक ड्रेसपर्यंतचा हा प्रवास केवळ कपड्यांमधील बदल नाही, तर तो स्त्रीच्या बदलत्या जीवनशैलीचा साक्षीदार आहे. आजही साडीचा पदर हा मायेचा आणि आशीर्वादाचा पदर मानला जातो.(Generational Blessings)
पूर्वीच्या काळी स्त्रिया नऊवारी साडी नेसायच्या. त्या साडीत त्यांचे उभं आयुष्य गुंफलेलं असायचं. घरकाम, शेतकाम असो वा सण-समारंभ; सर्व काही त्याच वस्त्रात पार पडायचे. ही साडी त्या काळच्या स्त्रियांच्या कष्टाची, ताकदीची आणि आत्मसन्मानाचं प्रतीक होती. काळ पुढे सरकला तशी नऊवारीची जागा सहावारीने घेतली. सहावारी साडी अधिक सोयीची, हलकी आणि बदलत्या शहरी जीवनशैलीला साजेशी होती. त्यानंतर फॅशनच्या जगात ड्रेस, जीन्स, पलाझो आणि मॅक्सी असे अनेक पर्याय आले. शिक्षण आणि नोकरीनिमित्त स्त्री घराबाहेर पडली आणि तिच्या पेहरावातही त्यानुरूप बदल झाले. हा बदल स्वीकारणे हीच स्त्रीची खरी ताकद ठरली; तरीही या सगळ्यात साडीचे अढळ स्थान कायम राहिले.
भारतीय साडीला आजही जगभरात 'आयकॉनिक' मानले जाते. परदेशातील कार्यक्रम असोत वा आंतरराष्ट्रीय फॅशन शो, साडी तिथे केवळ एक 'डिझाइन' म्हणून नाही, तर भारतीय संस्कृतीची ओळख म्हणून मिरवली जाते. विशेष म्हणजे, आजच्या पिढीमध्येही साडीची मोठी क्रेझ पाहायला मिळते. मॉडर्न ड्रेपिंग, स्टायलिश ब्लाऊज आणि फ्युजन लूक आला असला, तरी त्याचे मूळ मात्र साडीतच आहे. साडीचे प्रकार आणि पॅटर्न बदलले तरी त्यामागची भावना मात्र तीच आहे.
आजच्या 'Gen Z' पिढीमध्ये साडीबद्दल एक वेगळेच आकर्षण दिसतेय. ही पिढी दैनंदिन आयुष्यात पाश्चात्य कपड्यांना पसंती देत असली, तरी लग्नसमारंभात मात्र ती आपल्या मुळांकडे वळताना दिसते. आजची तरुण मुलगी जेव्हा आपल्या आईच्या लग्नातील शालू किंवा आजीची ५० वर्षे जुनी पैठणी पुन्हा नेसते, तेव्हा त्यामागे केवळ फॅशन नसते, तर मोठ्यांचा आशीर्वाद असल्याची भावना असते. जुन्या साडीचे काठ वापरून नवीन ड्रेस बनवणे किंवा आजीच्या साडीला आधुनिक 'बेल्ट' लावून स्टाईल करणे, हे आजच्या पिढीचे 'रिक्रिएशन' आहे. यात जुन्याचे सोने करण्यासोबतच आपल्या आई-आजीच्या आठवणींची जपणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो.
जागतिक स्तरावरही आज भारतीय साडीकडे आदराने पाहिले जाते. साडी नेसल्याने स्त्रीचे सौंदर्य तर खुलतेच, पण तिचा आत्मविश्वासही द्विगुणित होतो. पिढ्या बदलल्या, विचार बदलले आणि कपड्यांची लांबी-रुंदीही बदलली; पण 'साडी' या वस्त्राने आपले मोठेपण आजही जपले आहे.
शेवटी काय, तर काळ कितीही पुढारला आणि कितीही नवनवीन फॅशन आल्या, तरी साडीचे स्थान कधीच कमी होणार नाही. साडी आपल्याला मायेचा पदर, जरतारी काठ आणि त्या रेशमी धाग्यांमध्ये विणलेला आई-आजीचा आशीर्वाद देते, जो कधीच संपणार नाही. बदल स्वीकारताना आपल्या मुळांशी जोडून ठेवणारे हे वस्त्र उद्याच्या पिढीसाठीही तितकेच 'आयकॉनिक' राहील, हेच खरं!
