अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी कायम चर्चेत असतेच मात्र तिच्या संवाद कौशल्य आणि वैचारिक सामर्थ्यासाठीही असते. अनेक प्रसंगी तिच्या वक्तव्यामुळे लोकांना चालनाही मिळते आणि सोशल मिडियावर वादही होतात. तिने अलीकडेच एका इंस्टाग्राम लाइव्हमध्ये व्यक्त केलेले विचार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (Sushmita Sen said, "I want to get married but..." Hearing her opinion, a different discussion took place on social media.)सुष्मिता लाइव्हवर लोकांशी गप्पा मारत असताना एका लग्नासाठी आता ती जयपूरला जाणार असल्याचे म्हणाली. त्यावर मग तुम्ही लग्न कधी करणार असा एका चाहत्याने प्रश्न केला. त्यावर सुष्मिता म्हणाली, “लग्न करायची इच्छा फार आहे, पण तेवढं चांगलं कोणी भेटलच नाही. मनातून लग्न करण्याची भावना यायला हवी. फक्त लग्न करायचं वय झालं म्हणून लग्न उरकून टाकायला मला जमणार नाही. त्यात प्रेम असायला हवं. कोणी भेटली की लग्न नक्कीच करीन. शिवाय आनंद आणि सुरक्षित भविष्य यासाठी लग्नच हवं, ही मानसिकता चुकीची आहे,” असे स्पष्ट मत तिने मांडले. वयाच्या चाळीशीत असताना तिचा हा दृष्टिकोन योग्य की अयोग्य, यावर सोशल मिडियावर चाहते व्यक्त होत आहेत.
भारतीय समाजात आजही लग्नाकडे एका ठराविक वयात पूर्ण करायची जबाबदारी म्हणून पाहिले जाते. विशेषतः महिलांच्या बाबतीत “आता वय होत चाललंय”, “उशीर होतोय” अशा दबावाखाली अनेक निर्णय घेतले जातात. अशा पार्श्वभूमीवर सुष्मिता सेनचा दृष्टिकोन अनेकांना धाडसी आणि वास्तववादी वाटतो. तिच्या मते, लग्न हे सामाजिक चौकट पूर्ण करण्यासाठी नसून दोन व्यक्तींमधील प्रेम, समजूतदारपणा आणि भावनिक जोड यावर आधारित असावे. हा विचार आजच्या बदलत्या काळाशी सुसंगत आहे असे अनेकांचे मत आहे.
चाळीशीनंतरही स्वतःच्या भावनांना, अपेक्षांना आणि आनंदाला प्राधान्य देणे चुकीचे नाही, हे सुष्मिताच्या वक्तव्यातून अधोरेखित होते. लग्नामुळेच आयुष्य सुरक्षित, आनंदी किंवा पूर्ण होते ही संकल्पना आता हळूहळू बदलत आहे. आर्थिक स्वावलंबन, करिअर, मैत्री, कुटुंब, स्वतःची ओळख या सगळ्यांमधूनही समाधान मिळू शकते, हे वास्तव अनेक महिला आज जगत आहेत. त्यामुळे “लग्न नाही म्हणजे आयुष्य अपूर्ण” ही मानसिकता प्रश्नांकित करणे आवश्यक आहे. असे सुष्मिता म्हणते. शेवटी, सुष्मिता सेनने मांडलेला विचार हा लग्नाविरोधी नसून लग्नाला वयाची मर्यादा असते या विधाला प्रश्न करणारा आहे. तिच्या वक्तव्यामुळे लोकांना मात्र चर्चा करायला विषय नक्की मिळाला.
