Arvind Swamy : 'रोजा' आणि 'बॉम्बे'सारखे सिनेमे गाजले आणि देशातील लाखो तरूणी त्याच्यावर जीव ओवाळू लागल्या. त्याला देशभरात लोकप्रियता मिळाली. साऊथ फिल्स इंडस्ट्रीतील सुपरस्टार अरविंद स्वामी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्ससाठी चर्चेत होता. साऊथमध्ये कितीतरी सुपरहिट सिनेमे त्याने दिले. पण अचानक तो रूपेरी पडद्यावरून गायब झाला. करिअरच्या उंच शिखरावर असतानाच त्याच्यासोबत एक दुर्घटना घडली. २००५ साली त्याच्या मणक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर पायामध्ये अंशतः पॅरालिलिस झाल्यामुळे तो अंथरुणाला खिळून पडला आणि अनेक वर्षे संघर्ष करत राहिला. त्याला इंडस्ट्रीपासून दूर जावं लागलं. आता तो लवकरच 'गांधी टॉक्स' सिनेमात दिसणार आहे.
सर्जरी न करण्याचा निर्णय आणि मग...
अलिकडेच अरविंद स्वामीने इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये त्याच्या आगामी सिनेमानिमित्ताने भेट दिली. येथे त्याने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत खुलासा केला. यावेळी तो म्हणाला की, त्याने कोणतीही सर्जरी न करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर त्याला एक आयुर्वेद डॉक्टर भेटले आणि या डॉक्टरानी त्याला तीन दिवसात दुरूस्त केलं. तो चांगला चालायला लागला. यावेळी अरविंद हेही सांगायला विसरला नाही की, आयुर्वेद उपचार त्याच्यासाठी फायदेशीर ठरले असले, तरी ते सगळ्यांसाठी फायदेशीर ठरतील असं नाही. लोकांनी त्यांना देण्यात आलेले डॉक्टरांचे सल्ले फॉलो केले पाहिजे.
अरविंद सांगतो की, दीड वर्ष बऱ्याच वेदना सहन केल्यानंतर त्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी होकार दिला. मात्र, तेव्हाच त्याची केरळमधील एका आयुर्वेद वैद्याशी भेट झाली. तो नेहमी अॅलोपॅथीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्येच राहिला होता, त्यामुळे आयुर्वेद हा पर्याय असू शकतो, असा विचारच कधी केला नव्हता.
तीन दिवसात आयुर्वेद उपचाराचा प्रभाव
तो पुढे म्हणाला, “अवघ्या तीन दिवसांत आयुर्वेद वैद्यांनी मला चालायला लावले. हे उपचार माझ्यासाठी फायदेशीर ठरले. मी असं म्हणणार नाही की, तुम्ही माझ्या अनुभवावरूनच निर्णय घ्यावा. मी फक्त एवढेच सांगतो की हे माझ्यासाठी उपयोगी ठरले.” त्याने स्पष्ट केले की आयुर्वेदाबाबतचा हा त्याचा वैयक्तिक अनुभव आहे आणि अशाच परिस्थितीत असलेल्या इतरांवर त्याचा परिणाम होऊ नये.
अरविंदने सांगितलं की, १८ महिन्यांमध्ये त्याला शारीरिक संघर्षापेक्षा मानसिक संघर्ष जास्त सहन करावा लागला होता. “वेदना आणि हालचालींवरील मर्यादा यांना सामोरे जाण्याची क्षमता जास्त प्रमाणात मनावर अवलंबून असते,” असे तो म्हणाला.
तब्येतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर त्याला स्वतःवर जास्त ताण टाकायचा नव्हता. “मी चालू शकत होतो, वेदनाही कमी झाल्या होत्या, याचाच मला आनंद होता आणि कोणताही कठीण किंवा त्रास होईल असा मार्ग निवडायचा नव्हता,” असं त्यानं सांगितलं. त्याची मुले खूप लहान होती आणि त्यांना आई नव्हती, त्यामुळे पुढचं पाऊल उचलण्याआधी त्याला बराच विचार करायचा होता.
यादरम्यान दिग्दर्शक मणिरत्नम यांनी त्याला 'कदल' या सिनेमासाठी विचारणा केली. “तेव्हा सिनेमात काम करून १३ वर्षे होऊन गेली होती. मी पुन्हा सिनेमा करू शकेन, असं कधी वाटलंच नव्हतं. मी त्यांना सांगितलं की माझी शारीरिक स्थिती ठीक नाही. भरपूर औषधांमुळे वजन वाढले होते आणि केस गळाले होते. अभिनयासाठी मी तयार नव्हतो”. मात्र मानसिक आणि शारीरिक तयारीनंतर त्याने या प्रोजेक्टमध्ये उडी घेतली.
