मुंबई मेट्रोच्या भुयारातूनच थेट सिद्धी विनायक मंदिरात जाता येणार!, पाहा मेट्रोच्या भुयारीकरणाचे PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:14 PM2021-10-06T17:14:25+5:302021-10-06T18:35:58+5:30

Mumbai Metro 3 Work: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या बहुप्रतिक्षित भुयारी मेट्रोचं काम आता मोठ्या वेगात सुरू आहे. सिद्धिविनायक मंदिर येथे मेट्रोच्या स्थानकाच्या कामाचा आढावा आपण घेणार आहोत. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम हाती घेण्यात आले आहे. आजघडीला या मार्गावरील भुयारीकरणाचे काम ९७ टक्के झाले असून, नागरी काम ८० टक्क्यांवर झाले आहे. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)

याच मार्गावर असलेल्या सिध्दी विनायक स्थानकाचे कामदेखील वेगाने सुरु आहे. आजघडीला या स्थानकाचे एकूण काम सुमारे ७० टक्के झाले असून, दिवसागणिक या कामाचा वेग वाढत आहे. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)

स्थानकावर सुमारे पाचशेहून अधिक कामगार, कर्मचारी काम करत असून, कोरोनाच्या दिड ते दोन वर्षांनी सिध्दी विनायकसह उर्वरित कामांनी पकडलेला वेग उल्लेखनीय आहे. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिध्दी विनायक मेट्रो स्थानकातून थेट सिध्दी विनायक मंदिरात जाता येणार आहे.

देवस्थानाचे स्थानक असल्याने भविष्यातील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून हे ओळखले जाईल, असाही दावा केला जात आहे.

मेट्रो-३ प्रकल्पात बहुतांश स्थानकं जमिनीखालीच असणार आहेत. स्थानकांच्या निर्माण कामात आता वेग आला आहे.

आज उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये भरपूर गर्दी असते. जिथे फक्त १,७५० प्रवासी बसू शकतात, तिथे ५००० लोक प्रवास करीत असतात. मेट्रो -३ मुळे हा भार जवळपास १५% कमी होणे अपेक्षित आहे. संपूर्ण ट्रेन वातानुकुलीत राहणार असल्यामुळे प्रवाश्यांना आवाजाच्या / धुळीच्या प्रदूषणाचा त्रास होणार नाही व त्यांचा प्रवास जास्त आरामदायी होईल.

मुंबई मेट्रो -३ ही कुलाबा–वांद्रे-सिप्झ पट्ट्यामधून धावेल व नरीमन पॉइंट, वांद्रे–कुर्ला संकुल, फोर्ट, लोअर परळ, गोरेगाव इत्यादी आर्थिक केंद्रांना सुद्धा जोडेल. मेट्रो मुळे विमानतळ, नरीमन पॉइंट, कफ परेड, काळबादेवी, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, विमानतळ, सिप्झ व एमआयडीसी प्रथमच जोडले जातील. त्याशिवाय मुंबई मेट्रो -३ च्या मार्गामुळे चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनल सारखी ऐतिहासिक वारसा असलेली स्थानके सुद्धा जोडली जातील.

मुंबई मेट्रो -३ मुळे रहदारीचा होणारा खोळंबा टाळता येईल व त्यात वाया जाणारा महत्वाचा वेळ वाचवता येईल. एकदा अंमलबजावणी झाल्यावर मुंबई मेट्रो -३ मुळे ह्या पट्ट्यातील रहदारी सुमारे ३५% ने किंवा वाहनसंख्या सुमारे ४.५० लाखांनी कमी होऊन रस्त्यांवरील कोंडी कमी होईल.

मुंबई मेट्रो -३ च्या गाड्यांचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ब्रेकिंग मधून ४०% रिजनरेटीव एनर्जी प्राप्त होईल. प्रकलपाची अंमलबजावणी झाल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन सुरवातीपासूनच सुमारे १.०० लाख टनाने कमी होईल.