CoronaVirus In Maharashtra: इमारतीत घरकाम करणाऱ्या महिलांसह 'या' व्यक्तींची कोरोना चाचणी होणार; मनपाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:24 AM2021-03-11T10:24:57+5:302021-03-11T15:08:29+5:30

CoronaVirus In Maharashtra: मुंबईत शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ३७ हजार १२३ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ५११ झाला आहे.

कोरोनाचे संकट पुन्हा अधिक गडद होऊ लागले असून, एका दिवसात राज्यात कोरोनाचे १३ हजार ६५९ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ ही दीड हजारांच्या पुढे गेली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असून एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याचा गेल्या काही दिवसांतील हा उच्चांक आहे.

दिवसभरात मुंबईत १५३९, नागपूरमध्ये १५१३, पुण्यात १३८४, नाशिकमध्ये ७५० एवढे रुग्ण नोंदले गेले आहेत. राज्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ९९ हजार एवढे आहे. दिवसभरात ९,९१३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर एकूण ५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबईत शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ३७ हजार १२३ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ५११ झाला आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रसार दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्येच अधिक होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत २३ हजार दोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी ९० टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवासी असून दहा टक्के रुग्ण झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यामुळे प्रतिबंधित इमारतींमधील नियम कठोर केले जाणार असून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

मुंबईतील इमारतीत घरकाम करणाऱ्या महिला, वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्यांच्या कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांना लक्षणं नसली तरी चाचणी करण्याच्या सूचना देखील महापालिकेने दिल्या आहेत.

तसेच महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा देखील महापालिकेने दिला आहे.

लोकलसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. वारंवार सूचना करूनही लोक मास्क लावत नाहीत. त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारीचे नियम न पाळल्यास तसेच यापुढेही रुग्णवाढ अशीच कायम राहिल्यास लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.

मुंबईत गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. लग्न समारंभ, लोकल व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीत कोरोना खबरदारीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. रुग्णवाढ दिसत असली तरी चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पाच टक्के घट आहे. त्यामुळे तूर्तास लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असा पुनरुच्चार मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला आहे.

कोरोनाची साथ पुन्हा नियंत्रणात आणायची असेल तर त्यावर स्वयंशिस्त हा एकच उपाय आहे, असं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. कोरोनाचा साथ वाढण्याचा वातावरणाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कोरोना वाढणार नाही, असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.नागरिकांना कोरोनासंबर्धीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले ‘मी जबाबदार’ या सूत्राचे पालन केले पाहिजे. ते पाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर बंधनकारक आहे. कोरोनाची साथ स्वयंशिस्तीनेच आटोक्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.