आम्ही राम मंदिर बांधणार, देशाचा विकास करणार - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 09:10 PM2019-04-26T21:10:59+5:302019-04-26T21:18:38+5:30

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे.

We will build Ram temple, develop the country - Uddhav Thackeray | आम्ही राम मंदिर बांधणार, देशाचा विकास करणार - उद्धव ठाकरे

आम्ही राम मंदिर बांधणार, देशाचा विकास करणार - उद्धव ठाकरे

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्समधील एमएमआरडीएच्या मैदानावर झालेल्या महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यास अयोध्येत भव्य राम मंदिर बांधणार आणि देशाचा विकास करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

राहुल गांधी प्रचारासाठी मुंबईत येत नाहीत. इकडे फिरकतच नाहीत. राहुल आणि शरद पवारांची एकही मुंबईत सभा झाली नाही. कोण आधी कोण नंतर यावर त्यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळे मनाने एकत्र नसलेले लोक एकत्र सरकार बनविणार कसे? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

देशद्रोहाचे कलम काढायचे, कलम 370 काढू देणार नाही, अशी आश्वासने काँग्रेस देत फिरत आहे. तर, बांग्लादेशातला कलाकार फिरदोस अहमदला बंगालच्या प्रचारासाठी बोलावले जाते. हा देशाभोवतीचा फास आहे. तो उखडावाच लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली. 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे...
- आपल्याला हरवण्यासाठी 56 पक्ष जे एकत्र आलेले आहेत त्यांची एकही आपल्यासारखी एकत्रित सभा झालेली नाही. 
- मला अभिमान आहे आपल्या व्यक्तीची एकत्रित सभा मुंबई च्या जनसागरा मध्ये होत आहे. 
- जे लोक मनाने एकत्र येऊ शकत नाहीत ते देशाची लढाई एकत्र लढू कसे शकतात.
-  पाकिस्तानचे कंबरडे मोडणारे  पंतप्रधान. 
- काश्मीर मध्ये घुसून मारून दाखवलेल आहे.
- देशद्रोहाचे कलम काढणार हे बिनधास्त विरोधक सांगत आहेत.
- प्रचारासाठी सिनेकलाकार येतात येऊ शकतात. पश्चिम बंगालमध्ये एक बांगलादेशी फिरोज अहमद सिनेकलाकार बोलावलेला आहे.
- वंदेमातरम् हा मंत्र देणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी कलाकार आणावा लागतो. 
- काश्मीरमधील पिता-पुत्रांना दोन पंतप्रधान पाहिजे आहेत.
- मेहबूबा मुक्ती म्हणतात की 370 कलम काढल्यास तिरंगा हातात धरणार नाही. 
- 370 कलम काढणार आहे हे आमचे वचन आहे.
- देशद्रोह करणाऱ्यांवर जर आरोप टाकायचे नाही तर काय त्यांच्यासमोर पुंगी वाजवायचे का ?
 - देशद्रोह करणार त्याला फासावर जायलाच पाहिजे.
- हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचार आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी दिला.
- हो आम्ही युती केली जाहीरपणे केली. आम्ही कधी चोरून मारून कोणतीही गोष्ट केलेले नाही. 
- समविचारी हा एक विचार आहे.
-  आमच्याकडे कॉमन मॅक्सिमम प्रोग्राम आहे. 
- आम्ही राम मंदिर बांधणार, देशाचा विकास करणार. 
- गाडगे बाबांनी सांगितलं होतं जो तहानलेला आहे त्याला पाणी बेघरांना घर भुकेलेला जेवण आम्ही देणार.
- मोदीजी तुम्ही चिंता करू नका शिवरायांचा महाराष्ट्र आणि मुंबई तुमच्या पाठीशी ताकदीने उभी राहील. 
- शिवसेनाच नव्हे तर सर्व मित्र पक्ष तुमच्या पाठीशी उभे आहेत हे मी आपणाला वचन देतो.

Web Title: We will build Ram temple, develop the country - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.