Join us

“मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:20 IST

Sanjay Raut News: आमच्याकडे फक्त दोन तास ED, CBI, पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा ९० टक्के आऊटगोइंग करेल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा अगदी प्रतिष्ठेची केली होती. चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी थेट उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस पक्ष प्रचंड नाराज झाला होता. शेवटपर्यंत या जागेचा तिढा सुटला नाही. अखेर काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा लढवली आणि जिंकली. परंतु, आता हेच चंद्रहार पाटील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ऑफर असल्याचे खुद्द चंद्रहार पाटील यांनी सांगितले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यावर भाष्य करताना महायुतीवर हल्लाबोल केला. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पक्षातील आऊटगोइंग वगैरे शब्द बंद करा. पैशाच्या जोरावर, दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणे याला आऊटगोइंग-इनकमिंग अशा शब्दांच्या उपमा देऊ नका. २ तास आमच्याकडे ईडी, सीबीआय, पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा ९० टक्के आऊटगोइंग करेल. याला वैचारिक पक्षांतर वगैरे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कोणाला जायचे, कोणाला थांबायचे हा ज्याचा त्याच्या प्रश्न असतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल

उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही कोणत्याही प्रकारचा दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. देशाच्या राजकारणातील हा बराच जुना पक्ष आहे. भले अमित शाह यांनी महाराष्ट्रावर सूड उगवण्यासाठी पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला. पण भविष्यात शिवसेना काय आहे ते नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. 

दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, पक्षात राहून जर कारवाया कराल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते, त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसांत तसेच स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतरच अशा प्रकारची कारवाई केली जाते. चुकीचे काम आमच्याकडून होत नाही. मी म्हणजे पक्ष, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष हेच धोरण शिवसेनेत कधीच राबवले जात नाही, असे संजय राऊत म्हणाले.

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाचंद्रहार पाटीलउद्धव ठाकरेभाजपामहायुती