विलीनीकरणाच्या चर्चेला शरद पवार गटाचा पूर्णविराम; “विषय आमच्याकडून बंद करण्यात येत…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 05:46 IST2026-02-15T05:46:04+5:302026-02-15T05:46:40+5:30
आम्ही फक्त सत्य आणि शपथपूर्वक बोललो. दादांची जी इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र आता यावर बोलायचे नाही हे आम्ही ठरवले आहे, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.

विलीनीकरणाच्या चर्चेला शरद पवार गटाचा पूर्णविराम; “विषय आमच्याकडून बंद करण्यात येत…”
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात सुरू झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याने शरद पवार गटाने विलीनीकरणाच्या विषयाला आता पूर्णविराम दिला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी (दि. १४) विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून बंद करण्यात येत असल्याचे माध्यमांना सांगितले.
संरक्षक कठड्याचा भाग का कोसळला? समिती शोधणार कामाची गुणवत्ता, देखरेख, नियमावलींची तपासणी
२८ जानेवारीला विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर शरद पवार गटाकडून विलीनीकरणाचा विषय पुढे आला. यावर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय भाजपनेही या विषयात रस घेतला आहे. विलीनीकरणाची चर्चा करताना भाजपला विश्वासात घ्यावे, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याने विलीनीकरणाला खंड पडला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे म्हणाले, विलीनीकरणाच्या चर्चेवर आम्ही भावना व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीनीकरणाचे सूत्र कसे असेल याबाबत चर्चेत ठरवले जाणार होते. मात्र, चर्चा करणारा नेताच राहिलेला नाही. त्यामुळे आता यावर आम्हाला काहीच भाष्य करायचे नाही.
आम्ही फक्त सत्य आणि शपथपूर्वक बोललो. दादांची जी इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र आता यावर बोलायचे नाही हे आम्ही ठरवले आहे, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.
आमचा ‘नवीन कॅप्टन’ निर्णय घेईल : भुजबळ
सध्या सुरू असलेल्या विलीनीकरणाची चर्चा आणि निर्णय महिन्यानंतरही करता येईल; मग घाई कशासाठी?
माझ्यासमोर हा विषय कधीच आला नाही याबाबतचा निर्णय आमचा ‘नवीन कॅप्टन’ घेईल, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे सांगितले. सुनेत्राताई लवकरच बैठक घेतील. त्यानंतर आमदारांची भूमिका कळेल, असेही भुजबळ म्हणाले.