'राज ठाकरे हे जुन्या संकल्पना मोडीत काढणारे नेतृत्व'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 07:13 PM2018-06-17T19:13:18+5:302018-06-17T19:13:18+5:30

राज ठाकरे यांचे अनेक निर्णय परस्परविरोधी वाटले तरी त्यामागे त्यांची काही ठोस विचारसरणी आहे, हे महत्त्वाचे आहे.

Raj Thackeray leadership break all old political patterns | 'राज ठाकरे हे जुन्या संकल्पना मोडीत काढणारे नेतृत्व'

'राज ठाकरे हे जुन्या संकल्पना मोडीत काढणारे नेतृत्व'

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर|

 मुंबई: "ग्रीक नाटकांमध्ये संपूर्ण नाटकाचं कथासूत्र तोलून धरणाऱ्या सूत्रधाराला ‘सिंगल पर्सन कोरस’ म्हणून ओळखलं जातं; स्वत:ला सतत नव्याने घडवण्याची क्षमता आणि जुन्या बाद संकल्पना मोडीत काढून नव्या कल्पना स्वीकारण्याची हिंमत असलेले  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले 'सिंगल पर्सन कोरस' आहेत", असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी नुकतेच कांदिवली येथे काढले. सोशल मीडियाचा सजग वापर करणारे पत्रकार आणि लेखक कीर्तिकुमार शिंदे यांनी लिहिलेल्या ‘दगलबाज राज’ या पुस्तकाचे प्रकाशन कांदिवली पूर्व येथील तेरापंथ भवनात अंबरीश मिश्र यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते.

 राज ठाकरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक, ब्लॉग्ज आणि पोर्टल्स या ऑनलाइन माध्यमांमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे संकलन करण्यात आले आहे. विविध प्रश्नांवर राज यांनी घेतलेल्या भूमिका, मनसेने केलेली आंदोलने यांच्यामागची सैद्धांतिक बाजू समजावून सांगणारे हे लेख आहेत. ‘दगलबाज राज’ हे या पुस्तकाचे शीर्षक मराठीचे सखोल आकलन नसलेल्याला चमकवून टाकणारे आहे. त्यामुळे, मिश्र यांनी राज यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ या शीर्षकाच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन "शिवाजी महाराजांना कपटाने मारायला आलेला अफझलखान कसा ‘दगाबाज’ होता आणि त्याचं कपट ओळखून त्याचा डाव त्याच्यावर उलटवणारे शिवाजी महाराज कसे ‘दगलबाज’ म्हणजे मुत्सद्दी-चाणाक्ष होते," यातला फरक समजावून सांगितला. राज ठाकरे यांचे अनेक निर्णय परस्परविरोधी वाटले तरी त्यामागे त्यांची काही ठोस विचारसरणी आहे, हे महत्त्वाचे आहे, असे सांगून मिश्र म्हणाले की आज मनसेची स्थिती डळमळीत दिसत असली, तर राजकारणात एकच स्थिती कायम राहात नसते, ही परिस्थितीही पालटून मनसेला ऊर्जितावस्था येईलच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 मनसेचे प्रवक्ते व नेते अविनाश अभ्यंकर यांनी या कार्यक्रमात "व्यंगचित्रांच्या माध्यमातून राज ठाकरे हे सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करत आहेत. मात्र राजकीय कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता त्याचा योग्य तितकाच वापर करायला हवा" असं मत व्यक्त केलं.  ‘बिगुल’ पोर्टलचे संपादक व लेखक मुकेश माचकर यांनी आपल्या भाषणात "कीर्तिकुमार शिंदे यांचं 'दगलबाज राज' हे पुस्तक म्हणजे गेल्या चार वर्षांतल्या राजकीय घडामोडींचा इतिहासच आहे. हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण त्याचबरोबर त्याला एक संदर्भमूल्य आहे", असं मत व्यक्त केलं.

Web Title: Raj Thackeray leadership break all old political patterns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.