Join us  

जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची; शिवसेनेने पुन्हा ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 8:07 AM

महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत.

ठळक मुद्दे जगाची नाही तर मुंबई महाराष्ट्राच्या बापाची मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच दिल्ली किंवा महाराष्ट्रात सरकार कुणाचेही असो. एखादी अज्ञात शक्ती मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थान करत असते

मुंबई - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर करण्यात आलेली टीका आणि अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईची केलेली पीओकेशी तुलना यानंतर शिवसेनेने मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमकपणे समोर आणला आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जगाची नाही तर मुंबई महाराष्ट्राच्या बापाची असे ठणकावून सांगितले आहे. तसेच मुंबईचे खच्चीकरण कुणासाठी सुरू आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून संजय राऊत यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईसा पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांघकामावर उल्लेख करताच महानगरपालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच म्हटले पाहिजे, असा टोला या लेखातून भाजपाला लगावण्यात आला.६०-६५ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. मात्र त्यावेळी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळीबार केला त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत कशी असा सवाल केलाय. पण भाजपा नेत्यांच्या इतिहास कच्चा आहे. मोरारजी देसाई त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांच्या आदेशाने जशी महाराष्ट्रात माणसे शहीद झाली. तशीच गुजरातमध्येही १६ जण शहीद झाले. हेच मोरारजी पुढे काँग्रेसमधून बाहेर पडून पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडात अटलबिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत सर्व जनसंघीय दिग्गज सहभागी होते. प्रत्येक इतिहासाला एक काळी बाजू असतेच काँग्रेसने म्हणजे मोरारजी देसाई यांनी गोळीबार केला. तेव्हा त्याच्या निषेधार्थ केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या तोंडावर फेकणारे चिंतामणराव देशमुख हेसुद्धा काँग्रेसवालेच होते व महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सक्रिय समर्थक होते, असेही राऊत यांनी सुनावले.दिल्ली किंवा महाराष्ट्रात सरकार कुणाचेही असो. एखादी अज्ञात शक्ती मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थान करत असते. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी तुरुंगाच्या दारात रांग लावणारा मगरट्टा आझा निष्प्रभ झाला काय? भाजपा त्याच्या राष्ट्रीय धोरणानुसार भूमिका घेत आहे. अशीच राष्ट्रीय भूमिका पूर्वी काँग्रेस घेत असे, हे विसरता येणार नाही. आता पुन्हा एकदा मराठी माणसाचे आणि अस्मितेचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे काम सुरू आहे.आज मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचा एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक त्यांच्यामागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे, असा हा कठीण काळ आलाच आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला. यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच सांगावे, असे आव्हानही शिवसेनेने दिले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रशिवसेनासंजय राऊतभाजपाकाँग्रेस