शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 21:14 IST2026-01-11T21:12:24+5:302026-01-11T21:14:41+5:30
Mumbai Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगपालिका निवडणुकीतील प्रचारामध्ये सर्वांचं लक्ष लागलेली ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवतीर्थावर सुरू झाली आहे. तसेच या सभेमधून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ अंदाज दाखवला. तसेच यामधून राज ठाकरे यांनी पहिला घाव उद्योगपती अदानी यांच्यावर घातला.

शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...
मुंबई महानगपालिका निवडणुकीतील प्रचारामध्ये सर्वांचं लक्ष लागलेली ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवतीर्थावर सुरू झाली आहे. तसेच या सभेमधून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ अंदाज दाखवला. तसेच यामधून राज ठाकरे यांनी पहिला घाव उद्योगपती अदानी यांच्यावर घातला. २०१४ साली केंद्रात मोदी सत्तेवर आल्यापासून उद्योगपती गौतम अदानी यांच्या झालेल्या प्रगतीचा आलेख दाखवत या माध्यमातून भाजपाचा मुंबई तोडण्याचा डाव कसा आखला जातोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे म्हणाले की, २०२४ साली मला एक व्यक्ती भेटली. त्याने मला जी माहिती दिली. तसेच ती माहिती दिल्यानंतर माझी माणसं माझी रिसर्ज टीम कामाला लागली. त्यामधून जी काही माहिती समोर आली ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तसेच मी आज जे दाखवणार आहे ते पाहून समजा तुम्हाला भीती नाही वाटली, तर मला असं वाटतं की या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.
२०२४ नंतर मला हे सारं समजू लागलं. साधारणत: विधानसभा निवडणुकीच्या आसपास आमच्या रिसर्च टीमकडून या सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या. ते पाहून मला धक्का बसायला लागला. आपण डोळे झाकून बसतो आणि आपल्या खालून काय खणलं जातं हे आपल्याला कळतच नाही. अनेक हिंदी इंग्रजी वृत्तवाहिन्यांना ब्लॉक करून टाकलेलं आहे. कुणी काही तुम्हाला दाखवणार पण नाही. काही दाखवलं की वरनं फोन येतो, जाहिराती बंद केल्या जातील म्हणून दट्ट्या बसतो, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
त्यानंतर राज ठाकरे यांनी २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा गौतम अदानी यांच्या उद्योग समुदाचं देशात असलेलं स्थान आणि मागच्या १०-११ वर्षांत झालेला विस्तार याचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. तसेच अदानी उद्योग समुहाने महाराष्ट्र आणि एमएमआर परिसरात कसे हातपाय पसरले हेही आलेखाच्या माध्यमातून दाखवले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, हे फक्त दहा वर्षांत घडलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षांमध्ये इतका श्रीमंत झाला. कुठल्या उद्योगपतीने उद्योग करू नये, या मताचा मी नाही आहे. इतका दळभद्री विचाराचा मी नाही आहे. या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहेरबानी या देशामध्ये होते. मी देशातलं चित्र दाखवतच नाही. फक्त दहा वर्षांतील ही गोष्ट आहे. एकाच माणसाला एवढ्या गोष्टी दिल्या. वीज दिली, सिमेंट उद्योगामध्ये गौतम अदानी कधी नव्हतेच. मात्र आज ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यापारी आहेत. उद्या या माणसाने वीज बंद केली, तर आम्ही अंधारात जाऊ. सिमेंट महाग केलं तर काही बोलू शकणार नाही. सगळी बंदरं अदानींना दिली गेली आहेत. सगळी विमानतळं अदानींना दिली गेली आहेत, असा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला.