Join us  

Maharashtra Government: अजून बरेच जन्म घ्यावे लागतील; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात, म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 11:42 AM

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य रोज सकाळी आपण टीव्हीवर पाहतोय

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यावरुन शिवसेना-भाजपा यांच्यातील तणाव वाढलेला आहे. राज्यात महाशिवआघाडीचं नवीन समीकरण उदयास येत असताना भाजपाने आतापर्यंत शिवसेनेवर थेट टीका केली नव्हती. मात्र आज भाजपाने आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी? हे जनतेला माहित आहे असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.

याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य रोज सकाळी आपण टीव्हीवर पाहतोय, संजय राऊतांनी मोदीजींबद्दल प्रेम व्यक्त केलं, त्यांचं प्रेम स्वार्थी की निस्वार्थी हे जनतेला माहित आहे. अमित शाह आणि मोदीजी संजय राऊत यांना समजण्यासाठी अजून बराच काळ लागेल असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. 

तसेच संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वयासोबत त्यांच्या विचारांची परिपक्वताही वाढावी, यासाठी शुभेच्छा आहेत. सत्य सांगितल्यामुळे काही लोकांची अडचण झाली आहे. बाळासाहेबांच्या आदरापोटी नेते मातोश्रीवर जायचे, राजकीय स्वार्थासाठी असत्य पसरवणं हे अमान्य आहे. आता सत्तेच्या लालसेपोटी हॉटेलला चर्चेसाठी जावं लागत आहे. कुटुंबातील राज ठाकरेंनाही भेटायला मातोश्रीहून कोणी जात नव्हतं. आज मातोश्रीतून निघून माणिकराव ठाकरेंना भेटायला जात आहेत असा टोला आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. भाजपची आज संघटनात्मक तयारीची महत्वाची बैठक आहे. 90 हजार बूथवर संघटन मजबूत करणे या विषयावर आज देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील हे आज आमदार, खासदारांना मार्गदर्शन करतील. 

महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी व मी जाहीर भाषणातून केली. त्यावेळी शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, असे वक्तव्य अमित शाहा यांनी केले होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. पंतप्रधानांना खोटे पाडण्याची आमची इच्छा नव्हती. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला असता. आम्हाला मोदी आदरणीय आहेत आणि नेहमी राहतील. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला नाही. मात्र, आम्हीही शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समसमान वाटपाचा वारंवार उल्लेख केला. त्यावेळी भाजपने का आक्षेप घेतला नाही, अशी विचारणा राऊत यांनी केली.

बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. हे मोदींपर्यंत पोहोचविले गेले नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. बंद दाराआड झालेली चर्चा काय होती हे अमित शाह यांनी उघड करावे. कारण ही चर्चा ज्या ठिकाणी झाली ती जागा साधीसुधी नाही. मातोश्रीवरील ज्या खोलीमध्ये शाह आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली ती बाळासाहेबांची खोली होती. याच खोलीमध्ये बसून बाळासाहेबांनी अटलजी, आडवाणींपासून मोदींपर्यंत अनेकांना आशीर्वाद दिले आहेत असंही त्यांनी सांगितलं होतं.  

 

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेसंजय राऊतशिवसेनाभाजपानरेंद्र मोदीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019