आज लाॅकाडाऊनचा निर्णय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:06 AM2021-04-12T04:06:50+5:302021-04-12T04:06:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या नव्या लाटेला थोपविण्यासाठी लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय रुग्णांची संख्या नियंत्रणात येणे कठीण आहे, ...

Lockdown decision today? | आज लाॅकाडाऊनचा निर्णय?

आज लाॅकाडाऊनचा निर्णय?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या नव्या लाटेला थोपविण्यासाठी लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय रुग्णांची संख्या नियंत्रणात येणे कठीण आहे, अशी स्पष्ट भूमिका टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेतली आहे. जर तसे झाले नाही, तर राज्यात गंभीर परिस्थिती येईल, असेही एका तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

टास्क फोर्समधील तज्ज्ञांसोबतच्या चर्चेनंतर प्रशासकीय पातळीवरील हालचालींना वेग आला असून, आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १४ दिवसांपासून तीन आठवड्यांपर्यंतच्या लाॅकडाऊनची शिफारस टास्क फोर्समधील सदस्यांनी केली आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर सोमवारी सायंकाळपर्यंत लाॅकडाऊनचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत घेतलेल्या बैठकीत ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिविरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, डॉ.अविनाश सुपे, डॉ.उडवाडिया, डॉ.वसंत नागवेकर, डॉ.राहुल पंडित, डॉ.झहीर विराणी, डॉ.ओम श्रीवास्तव, डॉ.तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

काेविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढविणे, रेमडेसिविर उपलब्ध करणे, लसीकरण वाढविणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे या दृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी, असे मुख्यमंत्री म्हणाले, तसेच लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

* एसओपी तयार करणे सुरू

मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत, त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसताना धोका निर्माण झाला असून, लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी, असे त्यांचे म्हणणे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या संदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल. आगामी काळातील लाटा थोपविण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, पण आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी काही काळासाठी का होईना, कडक निर्बंध लावावेच लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

* रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवा

रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. अनावश्यक वापरामुळे आरोग्य यंत्रणेला अनावश्यक त्रासाला सामोरे जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. पुढील दहा-बारा दिवस रेमडेसिविर काळजीपूर्वक, काटकसरीने वापरणे आवश्यक आहे. त्यानंतर, पुढील बॅचमधील रेमडेसिविरचे लाखो डोस उपलब्ध होतील. मात्र, तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल. खासगी रुग्णालयांना होणारा पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्हावा, तर जिल्हा रुग्णालयात मात्र थेट कंपन्यांकडून रेमडेसिविर पोहोचवावे. दरावरही नियंत्रण ठेवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी आरोग्यमंत्री डॉ.टोपे यांनीही बोलताना आपण रेमडेसिविरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता, ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडेसिविरच्या संदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे, यावर कार्यवाही झाली आहे, अशी माहिती दिली.

* टास्क फोर्सच्या सूचना

९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्या दृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालिकेसारखे वॉर्ड वॉररूमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी, मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांनाही व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासू लागली आहे, त्याचे नियोजन करावे, ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे, यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे, एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा, आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे आदी सूचना करण्यात आल्या.

* ऑक्सिजन निर्मितीचे प्रयत्न

आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी, यावरही चर्चा झाली. प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या १,२०० मेट्रिक टनपैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून, पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून, तसेच देशपातळीवरील वाहतूकदारांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल, त्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

........................

Web Title: Lockdown decision today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.